गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इटियाडोह धरण जवळील असलेल्या ग्राम संजयनगर( बंगाली कॅम्प) येथे दबा धरून असलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाला. गुरुवार २५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
अंश प्रकाश मंडल (५) असे या घटनेतील मृतक चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंश प्रकाश मंडल (५) हा चिमुकला आणि त्याची आजी अर्चना झोडू मंडल यांच्यासोबत २५ सप्टेंबर च्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास लघुशंकेला घराच्या बाहेर अंगणामध्ये आले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या ५ वर्षीय चिमुकल्यांवर हल्ला करून मानेला पकडून फरकटत नेले चिमुकल्याच्या आजीने आरडा ओरडा केली असता परिसरातील लोकांनी आवाजाच्या दिशेने धावून बिबट्याने फरकळत नेलेल्या ठिकाणी पोहचले असता बिबट्याने चिमुकल्या सोडून पळ काढला.
जखमी मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले असता डॉक्टरने चिमुकल्याला मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल यांनी सांगितले. घटनेची माहिती वन विभागाला आणि पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी कडून देण्यात आली आहे. ५ वर्षे चिमुकला बिबट्याने मारल्याची घटना कानावर आल्याने सकाळी सात वाजेपासूनच संजय नगर येथील सर्व महिला पुरुष एकत्र येऊन प्रश्नाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत मुख्य रस्ता केशोरी- नवेगाव मार्ग पूर्णपणे बंद करून रस्ता रोको करण्यात आलेला आहे. घटना घडली त्यावेळी मृत चिमुकल्यांचे वडील एक दिवसा पूर्वीच कामासाठी गुजरात येथे गेले होते. तर मृतक मुलाची आई आपल्या माहेरी गेलेली होती. गावकऱ्यांनी हल्ला केलेल्या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच २९ ऑगस्ट २०२५ ला इटियाडोह धरण येथे आपल्या कुटुंबा सोबत फिरायला गेलेल्या ४ वर्षीय मुलावर ही बिबट्याने हल्ला केला होता. तर २०२४ मध्ये गोठणगाव येथे मंडई उत्सव सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच वाजता अंगणात असलेल्या लहान मुलावर सुद्धा हल्ला केल्याची घटना आहे. संजयनगर , बोंडगाव सुरुवात येथे खूप वेळा बिबट्या दिसल्याने गावकऱ्यांनी अनेकदा जोरजोराच्या आवाज देऊन परत लावण्यात आले आहे आणि या संदर्भात बिबट्यांच्या बंदोबस्त करावा असे वन विभागाला कित्येक वेळा परिसरातील नागरिकांनी सांगितलेले असताना सुद्धा वन विभागाने याकडे दुर्लक्ष दिल्याने गावकऱ्यांच्या वन विभागा च्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे.
या घटनेनंतर संजय नगर येथील ग्रामस्थांनी वनविभागावर चांगलाच रोष व्यक्त केला असून मागील ६ तासांपासून गोठणगाव ते केशोरी हा मार्ग ग्रामस्थांनी रोखून धरला आहे. ग्रामस्थांच्या रोष व्यक्त करत शासनाच्या गाड्यांना तोडफोड केली आहे. जोपर्यंत मृतक चिमुकल्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत वनविभागाकडून मिळत नाही व वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पाऊले उचलत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. तर यापूर्वी देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना परिसरात घडल्या होत्या त्यावेळी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे.