अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनीच व्हावे, ही काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे. ते पक्षाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. देशाला संकटातून गांधी परिवारच वाचवू शकतो, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी व्यक्त केले.
अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशाला उभे करण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यातच आहे. त्यामुळे खा. राहुल गांधी यांनीच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे नेतृत्व करावे, ही सर्वांची इच्छा असल्याचे पटोले म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांच्या टी-शर्टपेक्षा भाजपने महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर बोलावे. सत्तेत येण्यापूर्वी मोठं-मोठी आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सरकार करीत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडूनच हप्त्याच्या नावावर पैशांची वसुली केली. लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना अत्यंत नाममात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. आता नवीन कायदा आणला, ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर कर्ज असेल त्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही.

हेही वाचा : अमरावती : नवनीत राणांची दादागिरी चालणार नाही ; ॲड. असीम सरोदे

त्यामुळे १०० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, असा आरोप पटोले यांनी केला. देश विकून देश चालवणाऱ्या लोकांना राहुल गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही. देशातील सर्वधर्मिय नागरिकांना एकत्र आणून देश जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली आहे. त्यांच्यावर टीका केल्यास देशातील सुज्ञ नागरिक भाजपला सोडणार नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president said workers want rahul gandhi to become congress president in akola tmb 01