वाशिम : जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले. सध्या पिके फुलावर येत आहेत. मात्र, पाऊस रुसल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीनवर ‘पिवळा मोझ्याक’चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सोयाबीन पिके करपत असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पाऊस न आल्यास दुष्काळाचे सावट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सोयाबीन हब’ म्हणून वाशिम जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा सर्वाधिक पेरा आहे. सध्या जमिनीत काही प्रमाणात ओलावा टिकून आहे. त्यामुळे पिके तग धरून आहेत. परंतु पुढील तीन ते चार दिवसांत पाऊस न झाल्यास पिके धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ ऐवजी ५० ओबीसी उमेदवार; अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव अडकला?

विजेचा लपंडाव, बळीराजा दुहेरी कात्रीत

पावसाने उसंत घेतल्याने पिके जगविण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे विजेचा लपंडाव, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.

हेही वाचा – खळबळजनक! भंडारा अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; निवृत्तीला दोन दिवस उरले असताना उचलले टोकाचे पाऊल

‘पिवळ्या मोझ्याक’ची चिंता

सध्या सोयाबीन पिकावर ‘पिवळा मोझ्याक’सह इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडे नष्ट केल्यास धोका टाळता येण्यास मदत होईल, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought crisis in washim district waiting for rain pbk 85 ssb