यवतमाळ – नागपूर-यवतमाळ-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ निर्माण करताना यवतमाळ शहराबाहेरचा रस्ता सदोष पद्धतीने तयार केला. महामार्ग प्राधिकरणाने केलेली ही घोडचूक आता शहराबाहेर दोन उड्डाणपूल बांधून सुधारण्यात येत आहे. मात्र हे काम करताना सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत.
रविवारी सायंकाळी आर्णी मार्गावर वनवासी मारोती चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुचाकी सदोष दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबद्दल नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. या अपघातात प्रेम संतोष बावणे (१९) रा. शिवाजी नगर लोहारा, रोहित सुरेंद्र आमटे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला.
हे दोघे दुचाकी ( क्र.एमएच-२९-एएस-९८१२) ने यवतमाळकडे येत होते. या मार्गावर उड्डाणपुलाचे काम आणि बाजूने रेल्वे बोगद्याचे काम सुरू आहे. येथील तात्पुरते दुभाजक चुकीच्या पद्धतीने ठेवले आहे. त्यावर पुरेसे रिफ्लेक्टर बसविलेले नाही. त्यामुळे हे दुभाजक वाहन चालकाना जवळ येईपर्यंत दिसत नाही. या कारणाने येथे सातत्याने अपघात होतात. मात्र रविवारच्या अपघातात दोन तरुणांचा बळी गेल्याने रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागपूर-यवतमाळ-तुळजापूर राष्ट्रीय मार्ग तयार करताना कळंब मार्गावर हुंडाई शो रूम समोर आणि आर्णी मार्गावर वनवासी मारोती परिसरात तांत्रिक त्रुटी ठेवली. त्यामुळे येथे अनेक अपघात घडले. त्यात अनेकांचा जीव गेला कित्येक नागरिक कायमचे जायबंदी झाले. याबद्दल सातत्याने तक्रारी झाल्याने या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची परवानगी देण्यात आली. हजारो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता फोडून नव्याने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम संथगतीने सुरू आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्ग प्राधिकरणाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.
वळण रस्ता न काढता, आहे त्याच मार्गावर सिमेंटचे अगडबंब दुभाजक आणून ठेवले. त्यावर दोन्ही बाजूने रिफ्लेक्टरसुद्धा लावण्याचे सौजन्य महामार्ग प्राधिकरणाने दाखवले नाही. या सदोष दुभाजकांमुळे अपघात वाढल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः वर्गणी करून या दुभाजकावर रिफ्लेक्टर लावले. तेही आता निघाल्याने पुन्हा अपघात वाढले आहेत. या दोन्ही उड्डाणपुलाचे काम आणखी दोन वर्षे होण्याची शक्यता नसल्याने, या मार्गावर आणखी किती बळी जातील, असा प्रश्न विचारला जात आहे.
तेव्हाच उड्डाणपूल बांधला असता तर…
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे बांधकाम सुरू असताना अनेक व्यक्ती, संघटना, माध्यमांनी शहराबाहेर वळणरस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याची सूचना महामार्ग प्राधिकरणाला वारंवार केली. मात्र या सूचना धुडकावून रस्ता निर्माण करण्यात आला. त्यानंतर यवतमाळात प्रवेश करताना या दोन्ही अपघात वाढल्याने महामार्ग प्राधिकरणाने दोन उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली. तेव्हाच नागरिकांचे ऐकले असते तर, महामर्गाची सदोष निर्मिती झाली नसती. तसेच शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा झाला नसता, अशी चर्चा आहे. त्यावेळी या महामार्गाच्या बांधकामासाठी आणि आता तोडकामासाठी झालेला खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.