पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवण्यात आलं. मद्यधुंद अवस्थेत चालकाने ज्यांना उडवलं त्यातल्या तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी या अपघाताबाबत काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा असे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास नागपूरच्या झेंडा चौकात ही घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. कारमधून मद्याच्या बाटल्याही ताब्यात घेतल्या आहेत. तसंच या तिघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी ही माहिती एएनआयला दिली.

हे पण वाचा- Pune Porsche Accident : पोर्श अपघातावरुन ‘तो’ प्रश्न येताच शरद पवारांचा संताप, “मी एखाद्या वकिलाला..”

कारचा चालक आणि त्याचे सहकारी मद्यधुंद अवस्थेत

ज्या कारने आई आणि मुलाला आणि एका पुरुषाला धडक दिली त्या कारचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. इतकेच नाही तर त्याच्यासोबत कारमध्ये असलेले इतर दोन सहकारी सुद्धा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा आढळून आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

संतापलेल्या लोकांनी कार चालकाला दिला चोप

ज्या भरधाव कारने तिघांना जोरदार धडक दिली. त्या कारमध्ये एकूण तीन तरुण प्रवास करत होते. अपघातानंतर यापैकी दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर कार चालक हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले. यावेळी संतप्त जमावाने कारचालकाला बेदम चोप दिला. तसेच त्याच्या कारची तोडफोड सुद्धा केली. कारच्या काचा जमावाने फोडल्या आहेत.

पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये घडली घटना

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी कारचालकाला ताब्यात घेतले. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेवर केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ही घटना ताजी असतानाच देशाची उपराजधानी नागपुरात सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.