अमरावती : शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या विशिष्‍ट कंपनीच्‍या कापूस बियाण्यांची जादा दराने व छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या जुने कॉटेन मार्केट परिसरातील मे. नितीन कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून छापा घातला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारवाईत कृषी केंद्रातून या कापूस बियाण्यांची १० पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे (४९) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी कृषी केंद्र संचालक नीलेश राजकुमार अग्रवाल (४८) रा. अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…खासदार धानोरकर म्हणतात, “सहा विधानसभेच्या तिकीट मीच वाटणार”, पटोले म्हणतात पक्षात लोकशाही…

नितीन कृषी केंद्रातून विशिष्‍ट कंपनीच्‍या बियाण्यांची जादा दराने व छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती सागर डोंगरे यांना मिळाली होती. त्याआधारे सागर डोंगरे यांच्यासह जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख मल्ला तोडकर, कृषी उपसंचालक उज्वल आगरकर, मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे, कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर यांनी त्याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर कोतवाली ठाण्यातील दीपक श्रीवास, नरेंद्र उघडे व पंचांसोबत कृषी विभागाचे पथक नितीन कृषी केंद्राजवळ पोहोचले. यावेळी पथकाने डमी ग्राहकाला ९ हजार रुपये घेऊन नितीन कृषी केंद्रात पाठविले. डमी ग्राहकाने विशिष्‍ट कंपनीच्‍या कापूस बियाण्यांची मागणी केल्यावर कृषी केंद्र संचालक नीलेश अग्रवाल याने ८६४ रुपये प्रति पाकिट किंमत असताना १८०० रुपये अशा दामदुप्पट दराने ९ हजार रुपये घेत ५ पाकिटे डमी ग्राहकाला दिली.

हेही वाचा…पुतळ्याआडून कोणाचे हितरक्षण ? नागपुरात प्रशासनाच्या भूमिकेवर शंका

त्याचे बिलदेखील दिले नाही. त्याचवेळी डमी ग्राहकाने इशारा करताच दबा धरून बसलेले कृषी विभागाच्या पथकाने कृषी केंद्रावर छापा घातला. सर्वप्रथम गल्ल्यातील डमी ग्राहकाने दिलेले ९ हजार रुपये ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान कृषी केंद्रात संबंधित बियाण्यांची आणखी ५ पाकिटे आढळून आली. त्यानुसार पथकाने सदर १० पाकिटे जप्त केली.

ऐन पावसाळ्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्‍याचे आव्‍हान कृषी विभागासमोर आहे. शेतकऱ्यांना आपल्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या बियाण्यांमध्ये काळाबाजार होत असून काही दुकानदार शेतकऱ्यांना मूळ किमतीपेक्षा दुपटीने बियाणे विकत असल्याच्या आरोप होत आहे.

हेही वाचा…गडचिरोली : अर्चना पुट्टेवारच्या आशीर्वादाने भूमीअभिलेखमधील ‘तो’ कर्मचारीच बनला भूमाफिया? गैरमार्गाने अल्पावधीत कोट्यधीश

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विभागातील सर्व कृषी केंद्रांमध्ये दर्शनी भागात साठा व दर फलक अद्ययावत नसल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati agriculture department busts seed black market raids nitin krishi kendra for overcharging farmers mma 73 psg