नागपूर : एमआयडीसीसह शहरातील विविध भागात असलेल्या ६६५ उद्योगांपैकी २१९ उद्योगांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याचे अग्निशमन विभागाने केलेल्या सर्वेक्षणातूनच वास्तव समोर आले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील इमारतींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने आगीच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी हिंगणा एमआयडीसी येथे शाई तयार करणाऱ्या कंपनीला आग लागून त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. यानंतर अग्निशमन केंद्र आणि महापालिकेने अशा कंपन्यांच्या अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली व जिथे यंत्रणा सक्षम नाही त्यांना नोटीस देणे सुरू केले.

बुटीबोरी, एमआयडी हिंगणा व वाडी या भागात उद्योगांची संख्या बघता अतिरिक्त फायर टेंडरची गरज समोर येऊ लागली आहे. यापूर्वी हिंगणा एमआयडीसीतील कटारिया ॲग्रो कंपनीला आग लागली होती. त्यात युनिटचे प्रचंड नुकसान झाले. त्यापूर्वी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील स्पेसवूड, नितिका फार्मा आदी कंपन्यांना आग लागली. अमरावती मार्गावरील एका लॉजिस्टिक पार्कलाही मोठी आग लागली होती. उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु, बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीत अग्निशमन यंत्रणा सक्षम नाही. येथील युनिटधारक अग्निशमन सेवा वाढवण्याची मागणी करत असले तरी अतिरिक्त फायर टेंडर पुरवण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – नागपूर : कारवाईऐवजी तडजोडीवर भर! पाच महिन्यांत फक्त ७०६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

दरम्यान, शहरातील एमआयडीसीमधील कंपनीत अग्निसुरक्षा यंत्रणा बंधनकारक असल्यामुळे या प्रिंटिंगची शाई तयार असलेल्या कंपनीत अग्निशमन यंत्रणा होती की नाही याबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपास केला जाणार आहे. गेल्या सहा महिन्यात एमआयडीसीमधील छोट्या मोठ्या सात कंपनीमध्ये आगीच्या घटना घडल्याचे समोर आले असून त्यातील अनेक कंपनीमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा कमकुवत असल्याचे समोर आले होते.

एमआयडीसी अग्निशमन विभागाने अशा कंपनीला नोटीस देत बंद असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यानंतरही अनेक कंपन्यानी दुर्लक्ष केले आहे. महापालिकेने शहराच्या बाहेर आणि शहरात असलेल्या निवासी इमारतीमध्ये असलेल्या छोटे उद्योगामध्ये अग्निशमन यंत्रणा आहे की नाही याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसात शहरात उन्हाचा तडाखा वाढत असताना आगीच्या घटना वाढल्या आहे.

हेही वाचा – डबल डेकर उड्डाणपुलामुळे कोंडी, नागपूरकर त्रस्त, विमानतळ चौकात…

गेल्या आठ दिवसात शहरात आगीच्या आठ ते दहा घटना घडल्या असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कमी मनुष्यबळ असताना त्यावर नियंत्रण मिळवले आहे.

उद्योगाच्या इमारतींमधील बंद पडलेली किंवा नादुरुस्त असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. ज्या उद्योगांमध्ये यंत्रणा नाही त्यांनी तात्काळ यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. – बी.पी. चंदनखेडे, अग्निशमन अधिकारी, महापालिका.