नागपूर : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि अश्लील चाळे, विनयभंगाचे गुन्हे वाढले असतानाच आता कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये मुंबई पहिल्या तर नागपूर-पुणे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. राज्यातील महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटनासुद्धा वाढल्यामुळे राज्य महिला आयोगाने चिंता व्यक्त केली होती, हे विशेष. ही माहिती पोलीस विभागाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाने चिंता व्यक्त केली होती. बेपत्ता तरुणी देहव्यापाराकडे वळत असल्यामुळे पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे झाले आहे. सध्या राज्यात महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. क्षुल्लक कारणावरून घरातील वाद-विवाद वाढत आहेत. टीव्ही-मोबाईलचा वापर वाढल्यामुळे घर आणि संसाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आहे. अनेक कुटुंबात मुलांचे लग्न झाल्यानंतर घरात कुरबूर वाढत आहे. लहान-सहान वादातून सून किंवा आईवडील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवित आहेत. सध्या राज्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मुंबईत वाढल्या आहेत.

हेही वाचा – घटस्फोट प्रकरणात नपुंसकतेचा मुद्दा; शास्त्रीय आधार नसल्याने न्यायदानात होते गफलत

मुंबईत कौटुंबिक हिंसाचाराचे २१८ गुन्हे दाखल आहेत. त्यात एप्रिल महिन्यांत सर्वाधिक ६५, तर मार्च महिन्यात ५६ गुन्हे दाखल आहेत. जानेवारीत ५२ तर फेब्रुवारीत ४४ कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल आहेत. मुंबईत महिलासंदर्भातील एकूण १ हजार ९७७ गुन्हे दाखल आहेत. नागपूर शहरात कौटुंबिक हिंसाचाराचे ११८ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ गुन्हे अधिक आहेत. पुण्यात सर्वात कमी ५४ गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सर्वाधिक २८ आरोपींना कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज्यातील वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक असून कुटुंबसंस्थेला हानिकारक ठरत आहेत.

घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ

लग्न झाल्यानंतर सासरी नव्याने आलेल्या सूनेकडून कुटुंबियांच्या अनेक अपेक्षा असतात. घरातील स्वयंपाक, कपडे, भांडी-धुणी यासह सर्व कामे नवख्या सूनेकडून अपेक्षित असतात. तसेच सूनेच्या माहेरून हुंडा, महागड्या वस्तू किंवा लग्नात झालेले रुसवे-फुगव्यासह मानपानावरून सूनेवर टोमणे मारणे किंवा मानसिक त्रास देण्यात येते. पूर्वी आईवडिलांच्या संस्कारामुळे कोणत्याही स्थितीत सासरी जीवन कंठावे लागत होते. मात्र, आता सून थेट पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मोकळी होते. कौटुंबिक वाद वाढल्यामुळे घटस्फोटाचेही प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा – गोंदिया: देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी संघटीत समाज महत्त्वाचा : अतुल मोघे

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांना पोलिसांनी प्राधान्याने दाखल करावे. पोलिसांनी महिला संदर्भातील गुन्ह्यांकडे गांभीर्याने बघावे. राज्य महिला आयोगाकडून अशा घटनांना नेहमी प्राथमिकता देऊन अशा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या जाते – आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in incidents of domestic violence in maharashtra mumbai is first and nagpur is second adk 83 ssb