नागपूर : चारशे वर्षांपूर्वी शेक्सपियरने एका नाटकात ‘नावात काय आहे?’ असा सवाल केला होता. परंतु, एखाद्या परिसराचे नाव हे हजारो नागरिकांसाठी संकट ठरू शकते ही विश्वास न बसणारी गोष्ट नागपुरात घडली आहे. या वस्तीच्या नावावरून लोक त्यांना नको ते बोलतात, तर काही लोक त्यांना आता घुसखोरही म्हणायला लागले आहेत. वस्तीचे नाव सांगताच लोक संशयाने बघत असल्याने आता आमच्या वस्तीचे नावच बदलवून द्या, अशी मागणी समोर येऊ लागली आहे. हे प्रकरण काय आहे पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरच्या नाईक तलाव लगतच्या वस्तीचे नाव बदलण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत. नागपुरच्या एका वस्तीतील लोकांना हा प्रश्न विचाराल तर ते सांगतील ‘नावात खूप अडचणी आहेत…’ नागपुरच्या नाईक तलाव परिसरात वस्तीच्या नावावरून सध्या पोस्टरबाजी सुरू आहे. वस्तीतील लोकांना आता वस्तीचे नाव बदलून हवे आहे. कारण या वस्तीचे नाव आहे बांगलादेश. हे नाव कसे पडले आणि नागरिकांना ते का बदलून हवे आहे, यामागे सबळ कारणे देखील आहेत.

या नावामागे काय इतिहास आहे?

बांगलादेश वस्तीमध्ये मोठा इतिहास आहे. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा नवीन देश अस्तित्वात आला. तेव्हा काही कामगार नेत्यांनी नाईकवाडी या वस्तीचे नामकरण बांगलादेश असे केले होते. मात्र, आता हे नाव हीच मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्यात बांगलादेश येथून आलेल्या घुसखोरांच्या विरोधात तपासणी मोहीम सुरू असताना वस्तीचे नाव हे लोकांपुढे संकट म्हणून उभे ठाकले आहे. आमच्या वस्तीचा आणि बांगलादेशाचा काहीही संबंध नाही. पण आता नोकरी आणि विवाहात समस्या उत्पन्न होत आहेत. लग्न होण्यात आणि नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. आता हे नाव नकोच! असे कृती समिती सदस्य सचिन बिसेन यांनी सांगितले.

नागरिकांच्या अडचणी काय?

गेली चाळीस वर्षे इथे राहणारे सी रेड्डी यांनी सैन्यात नोकरीसाठी आवेदन केले होते. तेव्हा अर्जावरील पत्त्यावर वस्तीचे नाव पाहून त्यांना कित्येक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे त्यांना सैन्यात नोकरी मिळाली नाही. असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. काही वर्षांपूर्वी येथे एटीएसची कारवाई झाली. तेव्हा बांगलादेश येथून आलेले काही घुसखोर सापडले होते. त्यावेळी वस्तीतील लोकांना वस्तीच्या नावामुळे नवा धोका निर्माण झाल्याची जाणीव झाली. बांगलादेश हे नाव पाहून काही घुसखोर येथे अवैध झोपडी टाकून राहू लागल्याचे समोर आले होते. आजही आमच्या वस्तीचे नाव घेतले तर लोक संशयाने पाहतात किंवा टिंगल टवाळी करतात. आम्ही चिंतेचा आणि चेष्टेचा विषय झालो अशी खंत अन्य एका नागरिकाने व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local residents demand change name bangladesh settlement to naikwadi in nagpur dag 87 zws