आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यापूर्वी महायुती सरकार ही योजना आणली. यात लाडक्या बहिणींना दरमहा दी़ड हजार रुपये देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी-अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने याचा भरपूर वापर केला. या योजनेचा निवडणुकीत सकारात्मक परिणाम देखील झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला दोनशेच्यावर मिळालेल्या जागेचे यशही लाडकी बहिण योजनेला दिले गेले.

आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशामागे लाडकी बहिण योजना असल्याचे कबुल केले आहे. लाडकी बहिण योजनेमुळेच इतक्या मोठ्या संख्येत आमदार निवडून आणता आले, अशी कबुली पवार यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे रविवारी सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

हेही वाचा >>> “जिंदगी है… लडाई जारी है…”, काव्‍यात्‍मक पोस्‍टमधून नवनीत राणांनी व्‍यक्‍त केली नाराजी

काय म्हणाले पवार?

राष्ट्रवादीने महिला व बालविकास विभागाची दिलेली जबाबदारी आदिती तटकरे यांनी नीटप्रकारे सांभाळली आणि लाडकी बहिण योजना यशस्वी केली. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. काही खर्च हे आपल्याचा करावेच लागतात, ते टाळता येणे शक्य नाही, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलेय लाडकी बहिण योजना पुढे चालू राहण्यासाठी तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, अशी हमीही अजित पवार यांनी यावेळी दिली. लाडकी बहिण योजनेमुळेच इतक्या मोठ्या संख्येत आमदार निवडून आणता आले, असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्याची हॅटट्रिक; महायुतीतील तिन्ही पक्षांना स्थान

शाहू – फुले – आंबेडकर विचारधारा सोडणार नाही

लोकसभेच्या निकालानंतर कुणावर चिडायचे नाही, कायम हसत राहायचे असे ठरविले होते. जबाबदारी आली की त्याचे भान ठेवायचे असते, हे देखील निकालानंतर समजले. राष्ट्रवादी पक्ष कायम शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. पक्षात कालही तिच विचारधारेने होती, आजही तिच आणि उद्याही तीच राहणार. याबाबत कुठलीही शंका घेऊ नका,असे पवार म्हणाले.

सोयाबीन कापसाचा प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना मेहनत करावी लागेल. स्थानिक मुद्यांकडे लक्ष द्यावे लागेल. विदर्भात सोयाबीन कापूसचा प्रश्न आहे. भाव मिळत नाही ही शेतकऱ्यांमध्ये भावना आहे, असे मत व्यक्त करत पवार यांनी स्थानिक प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. विदर्भावर कुठेही अन्याय होऊ नये, याबाबत प्रत्येक निर्णयात काळजी घेऊ. सरकार स्थिर आहे, त्यामुळे चांगले कार्य करणे हीच एकमेव जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion ajit pawar statement regarding the future of ladki bahin yojana tpd 96 zws