अमरावती : राज्‍यातील सर्वच शहरांमध्‍ये कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. अनेक घरांमध्ये या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे असते. आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने अनेकांची अडचण होत होती, ती दूर करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला असून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्यात कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना नगर विकास विभागाने केली आहे. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानमंडळात २५ जुलै, २०२३ रोजी ‘राज्यातील पाळीव प्राणी कुत्रे, मांजरे, पांढरे उंदीर इत्यादी प्राण्यांसाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी’ या विषयासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील काही स्थानिक नागरी स्वराज्य संस्था मनुष्य स्मशानभूमीच्या शेजारी राखीव जागेत तर काही स्थानिक नागरी स्वराज्य संस्था घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी राखीव जागेत पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची व्यवस्था करतात. स्मशानभूमीच्या शेजारी जागेत पाळीव प्राण्यांचा अंत्यविधी केल्यास धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. पाळीव प्राण्यांचा अंत्यविधी करताना योग्य दक्षता न घेतल्यास दुर्गंधी व आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या राखीव जागेत इतर प्राण्यांचे मृतदेह फेकण्याची शक्यता असते.

राज्यात कुत्रे, मांजर, पांढरे उंदिर, गौवंशीय प्राणी इत्यादी पाळीव प्राणी पाळले जातात. पाळीव प्राण्यांची वयोमर्यादा कमी असते व त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यू प्राणी खाडी, तलाव, मोकळया जागा, पाण्याचे डबके किंवा रस्त्यावर फेकले जातात. मृत्यू प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न केल्यास दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करुन दयावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

या जागेस संरक्षक भिंत व सुरक्षा व्यवस्था असावी. मृत प्राण्यांचा अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घेण्यात यावी, जेणे करुन त्यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही. पाळीव प्राण्यांचे मृतदेह इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत, त्यामुळे इतर आजार पसरणार नाहीत, याची दक्षता संबंधित नागरी स्वराज्य संस्था यांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.