गेल्या दोन वर्षात गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यामुळे अनेक मोठे नक्षली नेते छत्तीसगडमधील ‘रेस्ट झोन’ समजल्या जाणाऱ्या अबुझमाड येथे अज्ञातवासात गेल्याने जिल्ह्यातील नक्षल चळवळ नेतृत्वहीन व खिळखिळी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्दिनटोला चकमकीत नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २८ नक्षली ठार झाल्यानंतर भूपती, राधक्का, तारक्का, जोगन्ना यासारखे मोठे नक्षली नेते अबुझमाडमध्ये वास्तव्यास असल्याचे कळते. त्यामुळे काही मोजके ‘डीव्हीसी’ दर्जाचे नक्षली गडचिरोली व सीमाभागात सध्या सक्रिय आहेत. गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेली कथित नक्षलवादी चळवळ कधी नव्हे इतकी कमकुवत झाली आहे. याचे श्रेय पोलिसांनी मागील अडीच वर्षात केलेल्या कामगिरीला जाते. पोलिसांनी सशस्त्र लढ्यासोबत ‘दादालोरा खिडकी’सारखे उपक्रम राबवल्याने दुर्गम भागातील नागरिकांसोबत एक संवादसेतू स्थापन केला. या माध्यमातून लाखो आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ दिला.

हेही वाचा : नागपूर : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे नक्षल्यांनी काही प्रमाणात मिळणारे जनसमर्थन देखील संपुष्टात आले. यादरम्यान संपलेले विविध दलम नव्याने चालू करण्यासाठी नक्षल्यांना याभागात कुणीही सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच गडचिरोलीत सध्या सक्रिय नक्षाल्यांमध्ये छत्तीसगडहून आलेल्यांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.मिलिंद तेलतुंबडे गेल्यानंतर दंडकारण्य झोनची जबाबदारी भूपतीकडे देण्यात आली. मात्र, तो देखील वयामुळे अबुझमाडमधून सूत्रे हलवत असतो. गडचिरोली जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण भाग छत्तीसगड आणि तेलंगणा सीमा लागून असल्याने आणि घनदाट जंगलामुळे नक्षल्याचे नंदनवन होते.

मात्र, आता त्या भागात विकास, रघू आणि जैनी यासारखे नक्षली शिल्लक आहेत. मधल्या काळात भास्करसारखा क्रूर नक्षली ठार झाला. महिला नक्षल नेता नर्मदाचा देखील अटकेनंतर पोलीस कोठडीत मृत्यू झाला. प्रभाकर, गिरीधर, रूपेशसारखे नक्षली नेते देखील अबुझमाडमध्ये गेल्याने नेतृत्वअभावी गडचिरोलीत नक्षली चळवळ शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नक्षल्यांनी काढलेल्या पत्रकातदेखील चळवळ कमकुवत झाल्याचे मान्य केले होते.

हेही वाचा : नागपूर : बिबट्याने प्राणीसंग्रहालयात शिरून केली काळविटाची शिकार

चळवळीची अस्ताकडे वाटचाल!

गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी सी ६० पथकाने दोन वर्षात केलेल्या कारवाईत ५५ नक्षल्यांनी ठार करण्यात यश आले, तर १६ नक्षल्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सशस्त्र कावाईसोबत पोलिसांनी आत्मसमर्पण योजना प्रभावीपणे राबवून आत्मसमर्पित नक्षल्याना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याने आत्मसमर्पणाचा ओघ दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे येत्या काळात या हिंसक चळवळीचा अस्त होईल असे कयास बांधल्या जात आहे.

आमच्या जवानांनी केलेल्या कारवाईमुळे उत्तर गडचिरोली भागात नक्षल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दक्षिण गडचिरोलीतील नक्षलीदेखील प्रचंड दबावात आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातून नक्षल्यांनी भरती करून पुन्हा संपलेले दलम बळकट करण्याचा नक्षल्यांच्या प्रयत्न आहे. – अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many top naxalite leaders are hiding in abuzmad kill of many naxals sp ankit goyal gadchiroli tmb 01