नागपूर : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला अपघात झाला, त्याला काही दिवस होत नाही तर देशभरातून विमानातील तांत्रिक बिघाड आणि त्यामुळे रद्द करणे, विमान माघारी घेणे, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. आता चक्क प्रवाशी पावसाच्या पाण्यामुळे भिजण्याची घटना नागपूर विमानतळावर घडल्याची माहिती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सने पावसाळ्यात प्रवाशांना एअरोब्रिजची सुविधा न देता बसने टर्मिनलवर आणण्यात आले. पण बस नीट नव्हती, प्रवाशांना नेण्यात येणाऱ्या बसच्या छतावरूनही पाणी टपकत होते. त्यामुळे प्रवासी भिजले.
ही घटना बुधवार, २५ जून रोजी घडली. मुंबईहून नागपूरला येणारे ६ई ५१४७ हे विमान मुसळधार पावसात विमानतळावर उतरले. सुरक्षित आणि कोरड्या मार्गाने टर्मिनलवर नेले जाईल, अशी प्रवाशांना अपेक्षा होती, परंतु एअरलाइन्सने एअरोब्रिजऐवजी बसची मदत घेतली. यादरम्यान, प्रवाशांनी पावसात भिजत बस गाठली. बसच्या छतावरूनही पाणी टपकत असल्याने त्यांना आतही आराम मिळाला नाही. या विमानात राज्य सरकारचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि सावनेरचे आमदार आशिष देशमुख इतर प्रवाशांसह होते.
प्रवाशांनी इंडिगो एअरलाइन्स आणि विमानतळ प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. असा निष्काळजीपणा पहिल्यांदाच घडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जास्त भाडे आकारूनही विमान कंपनी मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.