गोंदिया : राजआश्रय व लोकाश्रयाअभावी दुर्लक्षित असलेला नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान आपल्या गतवैभवाची वाट पाहत आहे. तथापि, येथील पर्यटन संकुलाकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन याचा कायापालट करावा, अशी अपेक्षा पर्यटनप्रेमींनी केली आहे. यासाठी संपूर्ण नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराचा आराखडा तयार होणे आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवेगावबांध पर्यटन संकुलामधील प्रतापगड किल्ला, ऐतिहासिक शिवमंदिर हा या परिसरातील ऐतिहासिक वारसा आहे. इटियाडोह धरण जे एकूण सात मोठ्या टेकड्या पोटात साठवून आकाराला आलेले धरण आहे. प्रतापगडला लागून तिबेटीयन वसाहत आहे. नैसर्गिक वनसंपदेने नटलेले नवेगावबांध पर्यटन संकुल व नवेगावबांध नॅशनल पार्क, त्यालगत असलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले मोठे जलाशय, हे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान या पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी दळणवळणाच्या जवळपास सर्वच सोयी उपलब्ध आहेत. या स्थळाला भेट देण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश अशा विविध भागांतून दळणवळणाची पक्की साधने उपलब्ध आहेत. दुसरीकडे संपूर्ण निसर्गाच्या कुशीत व इको टुरिझमसाठी प्रसिद्ध असे हे नवेगावबांध पर्यटनस्थळ लोकप्रतिनिधी, अधिकारी व शासनस्तरावर असलेल्या उदासीनतेमुळे विकासापासून वंचित आहे.

हेही वाचा – आता रेल्‍वे स्‍थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३ हजार ६५२ कॅमेऱ्यांची नजर

राजकीय दूरदृष्टी व प्रशासनाकडून याचा सविस्तर असा विकासा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मोठ्या बांधकामाची तसदी न घेता आहे त्या परिस्थितीत नैसर्गिकरित्या विकास केल्यास, या ठिकाणाचे पर्यटन वाढेल व अनेक लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. हिवाळ्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान व पर्यटन संकुल परिसर विशेषतः बर्ड सेंचुरीसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या काळात या तलावात नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात लहान-मोठ्या तलावावर विविध पक्षांचा संचार असतो. हे देशी-विदेशी पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणीच असते. साडेचारशे वर्षांपूर्वी राणी दुर्गावतीच्या पूर्वजांनी या ठिकाणी राजस्थानमधून येऊन संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात लहान-मोठे तलाव बांधलेले आहेत. त्यापैकी नवेगावबांध येथील बाराशे हेक्टरवरील निसर्गाच्या कुशीत व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या परिसरात संपूर्ण मातीचे बांधकाम करून हे जलाशय तयार केलेले आहे. या ठिकाणी खूप मोठा जलसाठा निसर्गाच्या फक्त पावसाळ्यातील पाण्याने जमा होतो. त्या पावसाच्या भरोशावर रब्बी व खरीप दोन्ही पिके घेतली जातात. एवढेच नव्हे तर तत्कालीन मालगुजारी क्षेत्रात असलेल्या पाच गावांनादेखील या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होत असतो. जवळपास पाच हजार हेक्टरवर या तलावातून सिंचन केले जाते. या पाण्यामुळे येथील शेती व शेतकरी समृद्ध असून तांदूळ व ऊस उत्पन्न या नवेगाव परिसरात या तलावाच्या पाण्यातून घेतले जातात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे पशूपक्षी, प्राणी यांचा समावेश असून, त्या पशुपक्ष्यांचे, प्राण्यांचे हमखास दर्शन पर्यटकांना होत असतो. मात्र, हे उद्यान गतवैभवावर अश्रू ढाळत आहे.

हेही वाचा – काय सांगता? चक्क वाघ आणि कासवात रंगलीय स्पर्धा! नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

या परिसरांचे साैंदर्यीकरण गरजेचे

संजय कुटी परिसरात नेचर ट्रेल ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, बालोद्यान, इंटरप्रिटेशन सेंटर, नवेगावबांध नॅशनल पार्कमधील टायगर सफारी गेटचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे, असे येथील पर्यटनप्रेमींना वाटते. पर्यटकांची संख्या वाढली की हे स्थळ रोजगार देणाऱ्यांची खाण होईल. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navegaonbandh national park deprived of development sar 75 ssb