लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( रा.दामरंचा) असे मृत व्यक्तीचे नाव असून आज, शुक्रवारी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरूवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक चालली. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा गावातील रहिवासी असलेल्या अशोक तलांडी या आदिवासी व्यक्तीचा भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

आणखी वाचा-नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

मृतदेह शेजारी टाकलेल्या पत्रकात नक्षल्यांनी अशोक हा पोलीस खबऱ्या असल्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच ताडगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी मृतक हा पोलीस खबऱ्या नसून चौकशीनंतर या प्रकरणाचा उलगडा होईल. असे स्पष्ट केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites active again in lok sabha election hype brutal killing of tribal citizen in gadchiroli mrj