राष्ट्रवादी काँग्रेसच्या समता परिषदेनिमित्त जितेंद्र आव्हाड काल (१६ जानेवारी) नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर त्यांनी जोर देऊन न्यायपालिकेत आरक्षण असायला हवं होतं असंं ते म्हणाले. तसंच, राजकीय आरक्षण दिल्याने मागासवर्गीय निवडून येऊ शकतो, असंही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आजही वाईट वाटतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला. न्यायपालिकेतील निर्णय अशी येतात की लगेच त्यातून जातीचा वास येतो.

मागासवर्गीय १०० टक्के पडणार

ते पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण का ठेवलं माहितेय? एकतरी मागासवर्गीय खुल्या निवडणुकीतून निवडून येऊ शकतो का? १०० टक्के तीन लाखांच्या मताने तो पडणार म्हणजे पडणारच. एखादा अकोलासारखा मतदारसंघ शेड्युल कास्टच्या उमेदवाराला निवडून देतो. त्यावेळेची परिस्थिती असते, १९९१ चं उदाहारण देतो, पवारांनी सगळ्यांना एक केलं, तेव्हा जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, प्रकाश आंबेडर आणि रा.सू गवळी निवडून आले. त्यासाठी सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा नेताही लागतो.

हेही वाचा >> जितेंद्र आव्हाडांची पुन्हा जीभ घसरली; म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत…”

आपल्याकडे आदर्शांची पूजा का होतेय?

“ओबीसीत अस्वस्थता निर्माण केली जाते की आरक्षण निघून जाईल, पण ही घटनात्मक तरतूद आहे. उगाच घाबरवून आपलं नेतृत्त्व स्थापित करायचं म्हणून समाजाला अस्वस्थ करायचं, हे समाजाला अपेक्षा भंगासारखं आहे. समाजाला तुमच्याकडून संरक्षणाची अपेक्षा असते. जे आजही बाबासाहेबांच्या बाबतीत एका वर्गाला वाटतं, म्हणजे ६ डिसेंबर, १४ एप्रिल आणि १ जानेवारी इथली गर्दी का वाढते, एवढी आदर्शांची पूजा का होतेय आपल्याकडे? अजूनही लोक विसरायला तयार नाहीत त्यांना. कारण त्यांनी आपल्याला माणूस बनवलं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

माझ्या आईला आमंत्रण यायचं नाही…

“मला कोणीही सांगू नका की समाजात जातीव्यवस्था नाहीय. मी ज्या सोसायटीत राहायचो, त्या सोसायटीत मांसाहार करणारी दोन-तीन घरे होती. भोंडला वगैरे कार्यक्रमांना माझ्या आईला कधीच आमंत्रण आलं नाही. सगळ्या बायका एकत्र बसायच्या. मी तिला विचारायचो ही मावशी आहे, ती मावशी आहे, मग तू का गेली नाही. ती म्हणायची मी असंच नाही गेले. पण तिला बोलवायचेच नाहीत. नंतर आपल्या लक्षात येतं. मग ती जखम भरून निघेल का कधी? ती भळभळतच राहणार. मी कोणा एका वर्गाचं प्रतिनिधित्व करत नाही. मी ओबीसी असलो तरी त्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. मी संविधानाच्या विचारांचं सामुदायिक प्रतिनिधित्व करतो”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One backward class from open election jitendra awhads questioned on political reservation sgk