Naxal Leader Bhupathi Surrender Gadchiroli Police : गडचिरोली : दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विविध राज्यात मिळून दहा कोटीहून अधिक बक्षीस होते. १६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भूपती हा नक्षलवादी संघटनेचा प्रभावशाली रणनीतिकार मानला जातो. तो अनेक वर्षे महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या शीर्ष नेतृत्वात मतभेद वाढले होते. भूपतीने ‘सशस्त्र संघर्ष ’ निष्फळ ठरल्याचे मान्य करून शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले होते. जनाधार घटला, शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे, असे त्याने एका पत्रकात म्हटले होते.

त्याच्या या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला. त्यांनी संघटनेचा महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणून शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर त्याने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अखेर आपल्या साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

या आत्मसमर्पणाची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नसली तरी, गडचिरोली पोलिस दलाच्या सूत्रांनी या हालचालींची माहिती दिली आहे. भूपती आणि त्याचा गट सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली असल्याचे कळते. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पणाचा क्रम सुरूच आहे. जानेवारीत भूपतीची पत्नी आणि वरिष्ठ नेत्या तारक्का हिने आत्मसमर्पण केले होते. भूपतीचे आत्मसमर्पण या संपूर्ण प्रवाहातील सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे.

नक्षल चळवळीचा शेवट?

राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणामुळे नक्षल चळवळ कमकुवत होत चालल्याचे स्पष्ट दिसते. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत ७०० हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून, भूपतीसारखा केंद्रीय नेत्याने शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळ कमकुवत झाली आहे. दंडकारण्याच्या जंगलात वर्षानुवर्षे टिकून असलेल्या नक्षल चळवळीचा आता शेवटचा टप्पा जवळ आल्याचे भूपतीच्या या निर्णयाने स्पष्ट संकेत दिले आहेत. नक्षलवादी चळवळीच्या ‘जनयुद्धा’चा हा शेवट ठरेल, अशी चर्चा सुरक्षा वर्तुळात सुरू आहे.