यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा ते देवगाव पाणंद रस्त्यावरील खडकाळी नाल्यावर महिनाभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या उन्हाळ्यात महागाव ते देवगाव या पाणंद रस्त्याच्या खडीकरणाचे काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाले. मात्र संबंधित ठेकेदाराने अत्यंत निष्काळजीपणाने व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या पाणंद रस्त्यावर खडकाळी नाला आहे. या नाल्यावर दोन पाईप टाकून पूल बांधून शेतकऱ्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे खडकाळी नाल्याला पूर येऊन पूल व रस्ता वाहून गेला. नाल्याचे पाणी शेतात घुसून शेत सर्वे नंबर २२६ , २२८ हरिभाऊ मुंडवाईक, सतिश भेंडे, बालू भेंडे, शरद मुंडवाईक आदींच्या शेतातील पेरणी केलेले पीक खरडून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पूल वाहून गेल्याने हे पाणी शेतातून सरळ झोपडपट्टीत घुसले. झोपडपट्टीतील नागरिकांचेही नुकसान झाले. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा>>>नागपूर: करोना प्रतिबंधात्मक लस कुणी घेईना! पूर्व विदर्भात १.१० लाख लस मात्रा मुदतबाह्य

संबंधित ग्रामपंचायतने त्वरित काम हाती घेऊन चांगल्या दर्जाचा पूल बांधावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा पूल बांधला नाही तर अशीच परिस्थिती उद्भवून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. या रस्त्याने सध्या शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे करणे सुद्धा अवघड झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bridge over khadkali nala on mahagaon kasba to devgaon panand road in darwa taluk was washed away in rain nrp 78 amy