लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक वृद्धा गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार, १० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारणी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली.

गजानन शनवारे (३५) रा. घाटलाडकी, चांदूरबाजार व अजय जामूनकर (३०) रा. भुलोरी, चिखलदरा अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातात गंभीर झालेल्या वृद्धेला परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गजानन शनवारे हे दुचाकी क्रमांक एमएच २७ बीए ७८४९ ने वृद्धेसह चिखलदरा तालुक्यातील मुसंडी येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते.

आणखी वाचा- लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’

त्याचवेळी अजय जामूनकर हे दुचाकी क्रमांक एमएच २७ डीएफ ०१३६ ने विरुद्ध दिशेने जात होते. मार्गात श्रीकृष्ण मंदिराजवळ दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गजानन शनवारे व अजय जामूनकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वृद्धा गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दहा महिन्‍यांत १२८ जणांचा मृत्‍यू

जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ४७३ अपघात झाले आहेत. २३९ प्राणांतिक अपघातांत २७० जणांचा मृत्यू झाला. त्यात २४७ पुरुष, तर २३ महिलादेखील होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूणच अपघातांत घट झाली आहे. एकूण ४७३ अपघातांत नऊ अपघात हे समृद्धी महामार्गावर झाले तर एनएएचआय, पीडब्ल्यूडी व एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील राष्‍ट्रीय महामार्गावर एकूण ९१ अपघातांची नोंद झाली, तर २१५ अपघात हे राज्य महामार्गावर झाले. शहरी रस्त्यावर ४१ तर ग्रामीण भागातील रस्त्यावर एकूण १०७ अपघातांची नोंद झाली. २७० अपघाती मृत्यूंपैकी सर्वाधिक १२८ मृत्यू हे राज्य महामार्गावर झाले. जून व सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक ६० जणांचा मृत्‍यू झाला.

आणखी वाचा-अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले

२४८ जण कायमचे जायबंदी

दहा महिन्यांत १२३ अपघात गंभीर होते. त्यात सुमारे २४८ जण कायमचे जायबंदी झाले. कुणाचा पाय, कुणाचा हात तर कुणाला अन्य अवयव कायमचा गमवावा लागला. त्यातही २१६ पुरुष, तर ३२ महिला आहेत. ९७ किरकोळ अपघातांत १७६ पुरुष व ३३ महिला असे एकूण २०९ जण जखमी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two speeding bikes collide head on two killed mma 73 mrj