वर्धा : मार्च अखेरीस उन्हाची काहिली सुरू झाली. त्याची दखल घेत वनविभाग सतर्क झाला. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जंगलातील पाणवठे शुष्क पडू लागल्याचे दिसून आल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेतील, म्हणून पाणी पुरवठा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. रस्त्यालगतच्या परिसरात टँकरने, तर दुर्गम जंगलात बैलगाडीने पाणी पुरवणे सुरू झाले.

उपविभागीय वनाधिकारी नितीन जाधव म्हणाले की, बिबट्यांचा अधिवास असलेल्या ब्राम्हणवाडा परिसरात तीन दिवसांपासून टँकरने पाणी पुरवणे सुरू झाले. तशी तजवीज पूर्वीच करण्यात आली होती, तर निवासी वनाधिकारी पवार यांनी नमूद केले की, जिल्ह्यातील ९२ कृत्रिम व ५३ नैसर्गिक पाणवठ्यांवर पाणी भरणे सुरू आहे. काही ठिकाणी सौरपंप आहेत. पण बाहेरून पाणी आणावेच लागते. पुढील दोन महिने प्राण्यांची तहान भागविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. माकड, बिबटे, वाघ, मोर, अस्वल, कोल्हे, लांडगे, सालुंद्री व अन्य प्राणी या पाणवठ्यांवर धाव घेत असल्याचे दिसून येते. काही भागांतील नाले आटल्यावर तर वनविभागाची कसोटीच लागणार.

हेही वाचा – ‘दुष्काळात तेरावा..! महाविद्यालयीन शिक्षणही आता ‘जीएसटी’च्या कक्षेत, गोंडवाना विद्यापीठाने काढले परिपत्रक

हेही वाचा – उपराजधानी की ‘क्राईम कॅपिटल?’; एकाच रात्री दोन हत्याकांडांनी शहर हादरले, शंभर दिवसांत १९ खून

जिल्हा वनाधिकारी राकेश सेपट म्हणाले की, दरवर्षी काही भागात मार्चच्या अखेरीस पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना गरजेनुसार प्रामुख्याने बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे. मनुष्याची ही सतर्कता बोर अभयारण्यातील वन्यजीवास खूप आधार देणारी ठरावी.