वर्धा : पर्यावरण, प्रदूषण व प्राणी संगोपन हे आता जागतिक पातळीवर जिव्हाळ्याचे विषय ठरले आहे. कार्बनचे किती प्रमाणात उत्सर्जन होत आहे, कारखाने प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाय करतात, नदी दूषित असे व अन्य प्रकार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. त्या अनुषंगाने परिषदांचे आयोजन होत असते. अशीच परिषद ११ ते १६ मार्च दरम्यान आयोजित आहे.
गेल्यावर्षी अशी परिषद अमेरिकेत झाली होती. आता यावेळी ही परिषद भरविण्याचा मान चीन या देशास मिळाला आहे. या तेराव्या जागतिक पाळीव प्राणी व्यवस्थापन परिषदेत भारतातून केवळ दोन प्रतिनिधी जात आहेत. येथील करुणाश्रम या विख्यात अनाथ पशु संगोपन अनाथालयचे संचालक आशिष गोस्वामी हे प्रतिनिधित्व करणार. तसेच त्यांच्यासोबत शुभम बोबडे यांचा सहभाग असणार आहे. दोघेही पीपल्स फॉर ऍनिमल्स या संस्थेचे पदाधिकारी आहेत. ही संधी मिळाळू म्हणून त्यांनी पीपल्स फॉर ऍनिमल्स संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मेनका गांधी यांचे आभार मानले आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हा दौरा सुलभ करण्यात सहकार्य केले. त्याबद्दल डॉ. भोयर यांच्याप्रती आम्ही कृतज्ञ आहे, अशी भावना आशिष गोस्वामी यांनी विमानतळावर असतांना व्यक्त केली.
चीन येथील शेंझेन या प्रांतात आयोजित या परिषदेत पाळीव प्राणी व्यवस्थापन, संगोपन, आहार व अन्य विषयावर चर्चा होणार आहे. तज्ञ् मंडळी मार्गदर्शन करतील. परिषदेत जगातील १०० देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहे.पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनातर्फे या दोघांना बिझनेस व्हिसा देण्यात आळस आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च पीपल्स फॉर ऍनिमल्स ही संघटना करणार.
ही एक फार मोठी उपलब्धी समजल्या जाते. प्राणी संगोपन व व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी समजल्या जाते. केवळ बेवारसच नव्हे तर अपघातात जखमी, स्थलांतरित, मानव हल्ल्यात जखमी पशुचा सांभाळ करण्याचे कार्य करुणाश्रम ही संस्था अनेक वर्षांपासून करीत आहे. या संस्थेस अनेक मंत्री, सामाजिक प्रसिद्ध कार्यकर्ते, पशुप्रेमी भेट देत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर गो पर्यटन ही संकल्पना अंमलात आणण्याची सूचना या संस्थेस केली आहे. या दौऱ्याबाबत बोलतांना आशिष गोस्वामी म्हणाले की प्राणी व्यवस्थापन हा खूप मोठा विषय आहे. प्राणी अनेक लोकं पाळतात. ते चांगलेच. पण या पाळीव प्राण्यांचे संगोपन करतांना काही काळजी घेणे आवश्यक असते. ती काय असावी हे पशू वैद्यकीय डॉक्टर सांगतातच. पण या विषयातील नवे तंत्र समजून घेण्यास ही जागतिक प्राणी व्यवस्थापन परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास गोस्वामी व्यक्त करतात.
© The Indian Express (P) Ltd