नाशिक – भेसळयुक्त, बनावट आणि विनापरवाना बियाणे, किटकनाशके उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाच्या भरारी पथकाने वर्षभरात केलेल्या कारवाईत एकूण १४२ नमुने अप्रमाणित असल्याचे उघड झाले. विक्री केंद्र तपासणीत दोषी आढळलेल्या २१ बियाणे विक्रेते, ३१ खत वितरक आणि २४ किटकनाशक विक्रेते अशा एकूण ७६ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. वर्षभरात वेगवेगळ्या प्रकरणात सहा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
खरीप हंगामाला सुुरूवात होत असताना बनावट बियाण्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी भेसळयुक्त, बनावट बियाण्यांची विक्री होते. खतांसोबत भेसळयुक्त किटकनाशक व अन्य सामग्री खरेदीची सक्ती केली जाते.
यंदा हे प्रकार रोखण्यासाठी कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. बनावट बियाण्यांची विक्री केल्यास थेट फौजदारी कारवाईचा इशाराही कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी दिला आहे. कृषी निविष्ठा गुणनियंत्रण अहवालावरून गतवर्षी फौजदारी कारवाईचा वेग मात्र संथ राहिल्याचे दिसून येते. २०२४-२५ या वर्षात भरारी पथकांनी बियाणे, खते व किटकनाशके यांचे २९७९ नमुने घेतले होते. यातील बियाण्यांचे ३५, खतांचे ९२ आणि किटकनाशकांचे १५ असे एकूण १४२ नमुने अप्रमाणित असल्याचे उघड झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या संदर्भात बियाण्यांच्या प्रकरणात १६, खतांविषयी दोन आणि किटकनाशकांची एक अशी १९ प्रकरणे न्यायालयात दाखल केली गेली.
वर्षभरात पथकांना नऊ हजार ७२१ विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य होते. त्या अंतर्गत नऊ हजार ०८१ केंद्र तपासणी साध्य झाली. त्यात दोषी आढळलेल्या २१ बियाणे विक्रेते, ३१ खत वितरक आणि २४ किटकनाशक विक्रेते अशा एकूण ७६ जणांवर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. सहा प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ५६.६५ किलो बियाणे, ९१.३५ मेट्रिक टन खते आणि २६६३ लिटर किटकनाशके जप्त करण्यात आल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. जप्त केलेल्या सामग्रीची किंमत ६५.९ लाख रुपये इतकी आहे.
बनावट, भेसळयुक्त किटकनाशके उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर दोन गुन्हे दाखल झाले. त्यात २३ लाख रुपये किंमतीची २६६३ लिटर किलोग्रॅम किटकनाशके जप्त केली. विनापरवाना खतसाठा, अनुदानित निमयुरियाची नियमबाह्य वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ४१.४ लाख रुपये किंमतीची ९१.३४७ मेट्रिक टन खते जप्त करण्यात आली.
कांदा बियाण्यांची बेकायदेशीर विक्री
देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. कांद्याच्या भेसळयुक्त आणि बनावट बियाण्यांनी आजवर अनेक उत्पादकांचे हात पोळलेले आहेत. विनापरवाना बेकायदेशीरपणे कांदा बियाण्यांचे उत्पादन व विक्रीच्या प्रकरणात कृषी विभागाने दोन फौजदारी गुन्हे दाखल केले. पावणेदोन लाखाचे ५६.६५ किलो बियाणे जप्त करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.