नाशिक : बाजार समित्यांमध्ये सोसायटी संचालकांऐवजी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार योग्य असला तरी समित्यांना खर्चामुळे निवडणूका घेणे कठीण होणार असून खर्चामुळे या संस्था मोडकळीस निघतील. भाजपकडून सहकार चळवळ मोडकळीस काढली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.

लासलगाव येथे नवनिर्वाचित विविध सहकारी सोसायटी संचालकांचा जाहीर सत्कार आणि शेतकरी मेळावा भुजबळ यांच्या उपस्थितीत झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना भुजबळ यांनी सहकारी संस्था टिकविण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता मांडली. संचालकांनी काही संस्था ओरबाडून खाल्ल्या आहेत. त्यामुळे काही सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. नाशिक जिल्हा बँकेतदेखील असाच प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचे काम सहकारी सोसायटय़ांनी केले आहे. सहकारी सोसायटय़ा या केवळ कर्ज पुरवठा करण्यापुरत्या मर्यादित राहू नये.

त्यांनी आपल्या कार्यकक्षा अधिक वृद्धिंगत कराव्यात. राज्यातील अनेक सहकारी संस्थांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहे. त्यांचा आदर्श सर्व सोसायटय़ांनी घ्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले. सहकार आम्ही मोडीत निघू देणार नाही, वेळप्रसंगी तुमचं सरकार मोडीत काढू, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी निवडणुकींना एकत्रित सामोरे जाईल. यासाठी सर्वानी एकत्र येऊन संघटन अधिक मजबूत करावे आणि महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. रस्त्यात अधिक खड्डे झाल्याने नाशिक-मुंबई प्रवास करणे अवघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे प्रवास करून परिस्थिती जाणून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.

सलगाव परिसरातील गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १७८ किलोमीटर रस्त्यांचे काम मंजूर झाले आहे. लासलगाव रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे.
इतर अनेक महत्वाची पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. नांदूरमधमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने सोळा गाव योजनेचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेसाठी २० कोटीरुपये मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पाऊस कमी झाल्यानंतर योजनेचे काम सुरू होईल. सदर योजना सौर ऊर्जेवर विकसित करण्यात येत असल्याने विजेच्या खर्चात मोठी बचत होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, गुणवंत होळकर आदी उपस्थित होते.