लहान मुलांमधील वाढता दृष्टिदोष अंधत्वासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवून शाळकरी मुलांची दृष्टी तपासणी अनिवार्य करावी, अशी मागणी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत केली आहे. यावेळी डॉ. पाटील यांनी मंत्री महाजन यांच्याशी मुलांच्या दृष्टिदोषाविषयी चर्चाही केली.शालेय मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव, अभ्यासाव्यतिरिक्त वाढता भ्रमणध्वनी, संगणक,दूरचित्रवाणीचा अतिवापर दृष्टिदोषासाठी कारणीभूत ठरत आहे. अशातच दुर्दैवाने काही मुलांच्या दृष्टिदोषाचे वेळीच निदान झाले नाही, तर त्यांच्यात कायमचा दृष्टिदोष राहू शकतो. प्रसंगी डोळा आळशी होऊन तिरळेपणाही उद्भवू शकतो. परिणामी अशा बालकांना भविष्यात पोलीस, भारतीय सैन्यदल, रेल्वे अशा अचूक दृष्टी आवश्यक असलेल्या ठिकाणच्या नोकरीपासून वंचित राहावे लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार मंगेश चव्हाणांची बिनविरोध निवड; दालनातून खडसेंची प्रतिमा हटवली

दृष्टिदोषामुळे जवळपास १९.७० टक्के मुलांमध्ये अंधत्व येऊ शकते. मोतीबिंदूनंतर अंधत्वाचे हे दुसरे कारण डोके वर काढत आहे. यासाठी वेळीच निदान आणि केवळ योग्य चष्म्याचा वापर करून आपण होणारे नुकसान टाळू शकतो. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळांमधील मुलांची दरवर्षी पुढील वर्गात प्रवेश होण्याआधी दृष्टी तपासणी अनिवार्य करावी. यामुळे वेळीच दृष्टिदोषाचे निदान होऊन दृष्टिदोष असलेल्या बालकांना आपण वेळीच चष्मा देऊन अथवा उपचार करून त्यांची दृष्टी वाचवू शकतो, असे डॉ. पाटील यांनी चर्चेतून मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. मनोज टोके, डॉ. सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr dharmendra patil demand to the minister of medical education to make eye examination of students mandatory amy