जळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी जलसंकट उभे राहण्याची शक्यता असून, आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४२.५३ टक्के जलसाठा असून, अग्नावती आणि हिवरा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. गतवर्षी २८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये ७३.६७ टक्के जलसाठा होता. सप्टेंबरमधील परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १३ गावांत १५ टँकर सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जून कोरडा गेला. जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण तुरळकच राहिले. पिके करपू लागली आहेत. सद्यःस्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, जळगाव, चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव परिसरात यंदा दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर प्रकल्प मिळून सुमारे ४२.११ टक्के जलसाठा असून, अग्नावती व हिवरा प्रकल्प कोरडेठाक आहेत. बोरी, बहुळा, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

हेही वाचा : धुळे मनपातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका, आयुक्तांकडून कारवाईची शक्यता

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, विसापूर तांडा, अंधारी, हातगाव, करंजगाव, कृष्णापूर, जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, जळांद्री बुद्रुक, सोनारी, करमाड, पाचोरा तालुक्यातील लोहारा व भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा या गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought in jalgaon district water supply to 13 villages through tankers due to low rainfall css