जळगाव – जिल्ह्यात जोरदार पावसानंतर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी मुक्ताईनगर तालुक्यातील एका मृताच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाख रूपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

जिल्ह्यात १५ तारखेला रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुक्ताईनगर तालुक्यात एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. तसेच पाचोरा तालुक्यातील २०० पेक्षा अधिक जनावरे आणि ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. जामनेर तालुक्यातही तीन जनावरे मृत्युमुखी पडली होती. नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान बाधित नागरिकांना सोसावे लागले. जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यानुसार, एकूण ७७ गावांतील १४ हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित होऊन ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील किरण सावळे (२८) या तरूणाचा सर्वात आधी १५ तारखेला नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने मृत्यू झाला होता. सावळे कुटुंबियांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव  पाटील आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत नुकताच चार लाख रूपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील आबा पिंगळे (३५) हे गेल्या गुरूवारी गावालगतच्या नदीत पाय घसरून पडल्याने बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला होता.

त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील लक्ष्मण ठाकरे (३०) हे शुक्रवारी वाघूर नदीवर म्हशी धुण्यासाठी गेल्यानंतर पुरात वाहुन गेल्याने बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी गावापासून चार किलोमीटर अंतरावर जोगलखेडा शिवारात त्यांचा मृतदेह सापडला. तसेच वडगाव टेक येथील नीता भालेराव (१४) ही मुलगी हिवरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पडल्याने शुक्रवारी बेपत्ता झाली होती. रविवारी सकाळी परधाडे शिवारात तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर वरखेडी (ता. पाचोरा) येथील सतीश चौधरी (३५) हे शेतातून येताना नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने सोमवारी सकाळी बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह गावालगत त्याच दिवशी ग्रामस्थांना काही तासांनी सापडला. 

काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, जोरदार पावसानंतर जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प आता तुडूंब भरले आहेत. काही सिंचन प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा सोडले आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत नदी काठावरील गावांमधील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.