मनमाड – जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ख्याती असलेल्या मनमाड -कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस गणेश मंडळाच्या धावत्या गाडीतील गणेशोत्सवाची परंपरा रेल्वे प्रशासनाच्या असहकाराच्या भूमिकेमुळे यावेळी खंडित झाली. यामुळे चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन मनमाड रेल्वे स्थानकात निषेधाचे फलक झळकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमाड -कुर्ला गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाचे यंदा २८ वे वर्ष होते. मंडळातर्फे धावत्या गाडीत गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. यामुळे श्री गणरायाला मनमाड ते कुर्ला हा दररोज ५५० किलोमीटरचा प्रवास गणेशोत्सव काळात घडत होता. पण यंदा या उत्सवासाठी ही गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची रेल्वे वारी हुकली. यापूर्वी दरवर्षी मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये चाकरमाने गणरायाची स्थापना करत. रेल्वे बोगीला घरासारखी आकर्षक सजावट करत. गोदावरी एक्स्प्रेसचा हा उत्सव देशभर प्रसिद्ध आहे. मात्र मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस करोना काळात बंद करण्यात आली. ती अजूनपर्यंत सुरू झालेली नाही.

हेही वाचा – गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी

हेही वाचा – नाशिक : शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या

त्यानंतर प्रति गोदावरी म्हणून धुळे -मुंबई -दादर ही गाडी सुरू करण्यात आली. गोदावरी एक्स्प्रेस धुळ्याला पळविण्यात आली. शिवाय यावर्षी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी रेल्वे कोच उपलब्ध करून न दिल्याने श्री गणरायाची स्थापना न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. धावत्या रेल्वेत गणपतीची स्थापना होण्याची गेल्या २७ वर्षांची परंपरा खंडित झाल्याची घटना घडली. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav tradition broken in manmad kurla godavari express non cooperation of railway administration ssb