नाशिक – आरोग्य शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व देण्याची भारताची क्षमता असून त्या दृष्टीने निर्धाराने पाऊले टाकली पाहिजेत, असे प्रतिपादन येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.

विद्यापीठात मेडएज्युइंडिया ॲट २०४७ च्या अुनषंगाने आयोजित ‘वन नेशन, वन करिक्युलम, वन आऊटकम’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुलगुरू कानिटकर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना कानिटकर यांनी करोनात भारताने जगातील विकसित देशांना जे जमले नाही ते करून दाखविले, असे सांगितले. आरोग्य शिक्षण भविष्यात आणखी उज्ज्वल व्हावे यासाठी पायाभूत घटकांचे विस्तारिकरण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींचा अवलंब करण्यासाठी स्थानिक पातळीवर मूलभूत घटकांचे सक्षमीकरण गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – कचरा ठेकेदाराला नगर परिषदेचे मोकळे रान; ठेका किंमत तिप्पट झाल्यानंतर देखील नगरपरिषदेकडून आवश्यक देखरेख नाही

परिषदेस एम.जी.एम. युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युर्निव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. अरुण जामकर, कृष्णा विश्व विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. प्रविण शिणगारे, राजस्थान आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर भंडारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा – लिहिण्या वाचण्याची अक्षमता; मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा वाचनासाठी १.६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव

राष्ट्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी विद्यापीठाव्दारे संलग्नित महाविद्यालय व शिक्षणसंस्था यामध्ये ई-लायब्ररीचा समावेश असावा तसेच वैद्यकीय क्षेत्राबरोबर आयुर्वेद, युनानी, नर्सिंग, होमिओपॅथी व अन्य शाखांचे प्राबल्य वाढविण्यासाठी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याची सूचना केली. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.