मालेगाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावातील बनावट जन्मदाखले घोटाळा उघडकीस आणला आहे. राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या हे वारंवार मालेगावचा दौरा करत आहेत. आज शुक्रवारी ते पुन्हा मालेगावला येत आहेत. यावेळी ते कोणता ‘बॉम्ब’ टाकणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात मालेगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघड केला होता. शहरात ४ हजारावर अर्जदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विलंबाने जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून आदेश प्राप्त केले. तसेच या आदेशांच्या आधारे महापालिकेकडून बोगस जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केली. अशी प्रमाणपत्रे प्राप्त करणारे बांगलादेशी वा रोहिंगे घुसखोर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

सोमय्या यांच्याच पाठपुराव्यानंतर याप्रकरणी मालेगावात फसवणुकीचे वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले असून ५३९ संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात आले आहेत. त्यात तहसील कार्यालय व महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी,अर्जदार,वकील व दलालांचा समावेश आहे. त्यातील काही संशयीत तुरुंगात आहेत. बांगलादेशी व रोहिंगे घुसखोरांनी जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केली,अशी तक्रार प्राप्त झाल्याने राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आणि नाशिकच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी ) या प्रकरणाची चौकशी करवून घेतली.

मालेगावातील बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अन्य शहरातही अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले. त्यानुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून राज्यभरात जवळपास ४७ हजार लाभार्थ्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बोगस प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या अशा सर्वांची प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई देखील यापूर्वीच झालेली आहे. तसेच या अपात्र अर्जदारांनी जन्म तारीख बदलण्यासाठी आधार कार्ड प्राधिकरणाकडे अर्ज केला असता, त्यांची आधार कार्ड नोंदणीही अलीकडेच प्राधिकरणाकडून रद्द केली गेल्याचा सोमय्या यांचा दावा आहे.

बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मालेगाव महानगरपालिकेने ३२७३ जणांचे जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलच्या नागरी नोंदणी प्रणालीवरून (सीआरएस) देखील ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती मालेगाव महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेली जन्म प्रमाणपत्रे तसेच आधार कार्ड रद्द झालेल्या ३२७३ लोकांचा भारतात जन्म झाल्यासंबंधी कोणताही ठावठिकाणा त्यामुळे लागत नाही,असा सूर लावत मतदार यादीतील त्यांची नावे वगळण्यात यावीत,अशी मागणी सोमय्या यांनी यापूर्वीच केली आहे.

या पार्श्वभूमीवर सोमय्या हे मालेगावला येत आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता ते मुंबईहून येथे कारने पोहोचणार आहेत. येथे आल्यावर प्रथम ते महापालिकेत जाणार आहेत. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला ते भेट देणार आहेत. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांच्याशी चर्चा केल्यावर दुपारी ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या दौऱ्यात ते आता कोणता नवा मुद्दा उपस्थित करतात, याबद्दल उत्कंठा आहे.