नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी सकाळी नाशिक ते पंढरपूर या ३६० किलोमीटरच्या पर्यावरण संवर्धन सायकल वारीस प्रारंभ झाला. पर्यावरणपूरक वारीत यावेळी सायबर फसवणुकीविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. वारीत २०० हून अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत.नाशिक सायकलिस्टव्दारे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम वारीदरम्यान राबविण्यात येत असतात. यावर्षी सायबर फसवणूक या विषयावर वारीत प्रबोधन करण्यात येणार आहे.

शुक्रवारी सकाळी सायकल वारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून निघाली. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी असा गजर करीत फेरीला सुरूवात झाली. प्रारंभी फेरीचा मार्ग कसा असेल , सायकलपटूंनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती देण्यात आली. वारीत महिलांचाही समावेश असून १६ ते ७५ वयोगटातील सायकलपटू सहभागी झाले आहेत. वारीबरोबर वैद्यकीय, सायकल दुरूस्ती पथक तसेच स्वयंसेवकाचा चमु आहे.

सायकल वारी तीन दिवसात पंढरपूर गाठणार आहे. तिसऱ्या दिवशी राज्यातील ९० सायकल क्लब पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा करणार आहेत. यानंतर परतीच्या प्रवासाला सुरूवात होईल.वारीदरम्यान ” डिजिटल सापळा” हे पथनाट्य ठिकठिकाणी सादर करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरीश बैजल यांचे पथनाट्यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.