गर्दीचा अंदाज चुकल्याने प्रशासनाच्या उरात झालेली धडधड आणि त्र्यंबकमधील अति गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यानंतरही सुमारे पंधरा किलोमीटरची पायपीट करीत त्र्यंबकनगरी गाठणारे लाखो भाविक, हे वैशिष्टय़ ठरले त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी पार पडलेल्या सिंहस्थातील तिसऱ्या शाही पर्वणीचे.
नाशिक येथील तीनही आणि त्र्यंबकेश्वर येथील पहिल्या दोन पर्वण्या शांततेत पार पडल्याने जिल्हा प्रशासनाने शेवटची पर्वणी यशस्वी करण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच काटेकोर नियोजन केले होते. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्रीच त्र्यंबकमध्ये आगमन झाल्याने यंत्रणा अधिकच सजग झाली होती. मुंबईतील चिनी दूतावास आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने कुशावर्त तीर्थात कैलास मानसरोवराचे जल अर्पण करण्याचा सोहळा मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी कौन्सिल जनरल यान हुआ लॉन्ग, अ‍ॅन लिना, पालकमंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. त्यानंतर पहाटे चारपासून कुशावर्तात आखाडय़ांच्या शाही स्नानास सुरुवात झाली. तत्पूर्वी नील पर्वताच्या पायथ्यापासून शाही मिरवणुकीद्वारे येणाऱ्या साधू, महंतांचे दर्शन घेण्यासाठी शाही मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. काही भाविकांनी मिरवणुकीतच शिरकाव करून पोलिसांची त्रेधातिरपीट उडवून दिली. दुपारी १२ पर्यंत सर्व आखाडय़ांचे शाही स्नान पूर्ण झाल्यानंतर कुशावर्त भाविकांना स्नानासाठी खुले करण्यात आले.
प्रशासनाच्या अपेक्षेपेक्षा अधिक भाविक त्र्यंबकमध्ये दाखल झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे पोलिसांसाठी कठीण गेले. पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा वापर केल्याने भाविकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. कुशावर्त परिसरात रेटारेटी झाल्याने काही महिला खाली पडल्या; परंतु पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनाने दुपारी १२ पर्यंत नाशिक-त्र्यंबक रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाविकांना कित्येक तास बसमध्ये बसून राहावे लागले. वाहतूक बंद झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावर बसगाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश प्रवाशांनी बसमधून उतरत सुमारे १५ किलोमीटरची पायपीट करत त्र्यंबक गाठले. कडक उन्हात पायपीट केल्याने पायात गोळे येणे, उलटय़ा होणे, अशक्तपणा यामुळे ४० ते ५० भाविकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्र्यंबककडे भाविकांचे जाणे सुरूच होते. तसेच त्र्यंबकमधून बाहेर पडणाऱ्यांचीही धडपड सुरू झाल्याने वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या अंतिम पर्वणीस ३० ते ४० लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा अंदाज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सर्व पर्वण्या कोणताही अनुचित प्रकार न होता पार पडल्याचे श्रेय त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेसह भाविकांनाही दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबादच्या भाविकाचा मृत्यू
प्रचंड गर्दीमुळे त्र्यंबकेश्वर येथे जमा झालेल्या अनेक भाविकांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे ५० पेक्षा अधिक भाविकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यातच औरंगाबाद येथील अंबादास अदाने (४८) यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The last of the three shahi snans holy dip that took place in trimbakeshwar