केवळ साडेतीन महिन्यांत खड्डय़ांनी रस्ता खिळखिळा पनवेल : साडेतीन महिन्यांपूर्वी वाहनांसाठी खुला केलेला, कामोठे ते कळंबोली या दोनही वसाहतींना जोडणारा रस्ता सध्या खड्डय़ांमुळे चर्चेत आहे. बांधकामावर कोटय़वधी रुपये खर्च केल्यानंतर सिडको मंडळाने हा रस्ता खुला केला, पण सध्या याची परिस्थिती दयनीय आहे. पनवेल पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल पालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. मात्र जेमतेम साडेतीन महिन्यांत येथील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहन चालवण्यायोग्य झाल्यानंतर लवकरच येथून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बस सेवा धावणार आहे. त्यामुळे कळंबोली सर्कलचा वळसा, प्रवासाची वेळ व इंधनाचा खर्च वाचणार आहे. कळंबोलीकरांना मानसरोवर रेल्वे स्थानकाशी जोडणारा हा मुख्य रस्ता शीव-पनवेल महामार्गावर कळंबोलीची ओळख सांगणारा ठरणार आहे. सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे बांधकाम सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी केली की नाही, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.