उरण : जल प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या करंजा-रेवस व मोरा- मुंबई हे दोन्ही मार्ग अर्धवट आहेत. त्यामुळे उरणला जोडणारे जलमार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवासी करीत आहेत. करंजा-रेवस मार्गावरील करंजा जेट्टी तयार होऊनही सुरू न झाल्याने जेट्टीची दुरवस्था सुरू झाली आहे. २५ कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यात आलेल्या या जेट्टीवरील विजेचे खांब कोसळू लागले आहेत. तर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कठडे तुटून पडू लागले आहेत. तर जेट्टीच्या बीमना गंज चढू लागला आहे. तर पायऱ्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का व उरणच्या करंजा आणि अलिबागच्या रेवस या उरणला जोडणाऱ्या शंभर कोटींच्या दोन्ही जलमार्गावरील रो रो जलसेवेचे काम रखडले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून या मार्गावरील काम अपूर्णच आहे. यामध्ये मोरा जेट्टी ७५ कोटींची तर करंजा रेवस २५ कोटींचे काम आहे. या मार्गावरील कामाच्या दिरंगाईमुळे खर्चात ही वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मोरा जेट्टीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. मात्र असे असले तरी लवकरच या रो- रोच्या कामाला सुरुवात करून २०२५ च्या निश्चित वेळी मार्ग सुरू होईल असा दावा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा…अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास मंदगतीने

उरणमधील नागरिकांसाठी आपल्या खाजगी वाहनांसह मुंबईत ये-जा करता यावे याकरिता मोरा ते मुंबई व करंजा रेवस रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जलसेवेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जलमार्गाचे काम अनेक वर्षे रखडल्याने या कामाचा अंदाजित ५० कोटींचा खर्च वाढून ७५ कोटींवर पोहचला आहे.

मोरा पोलीस ठाणेनजीक जेट्टीचे काम सुरू असून दगडांचा भराव करून जेट्टी बांधण्यात येत आहे. उरणवरून मुंबईत ये जा करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या रो रो जेट्टीच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

हेही वाचा…विजय चौगुलेंचे गणेश नाईक यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू

उरणकरांसाठी वाहनासह जलप्रवासाचा उत्तम पर्याय

उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना आपलं चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे. त्यामुळे वाहनासह उत्तम प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे उरण व अलिबाग या दोन तालुक्यांदरम्यान दोन किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोट्या बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली. त्यानुसार २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो रोची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंतर कमी होणार

या रो रो सेवेमुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील ५० किलोमीटरपेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे.

हेही वाचा…वाशीतील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित

प्रवासी संख्या वाढली

उरणमधील वाढते उद्याोग आणि नवी मुंबईच्या जवळ असणारे शहर म्हणून तसेच उरणमधून नव्याने लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व शिक्षण यानिमित्ताने उरण ते अलिबागदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Completion delayed on key waterways of karanja to revas mora to mumbai in uran roro services stalled amid infrastructure issues psg