उरण : तालुक्यातील नागरी वसाहत व औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी) उरणमध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मंगळवार व शुक्रवार आशा दोन दिवसांच्या पाणी कापतीला सुरुवात केली आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचेही आवाहन केले आहे. यामुळे उरणच्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण तालुक्याची लोकसंख्या नागरीकरणामुळे वाढू लागली आहे. त्यामुळे उरणला अधिकच्या पाण्याची गरज आहे. मात्र उरणमधील २३ ग्रामपंचायती तसेच नगरपरिषदेलाही येथील रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र रानसई धरण ६० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यावेळी या धरणाची क्षमता १० लाख दशलक्ष घनमीटर होती. या धरणात मागील ६० वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी होऊन ७ दशलक्ष घनमीटरवर आली आहे.

हेही वाचा – बारवीच्या पाण्याची प्रतीक्षाच, बारवी विस्तारीकरण योजनेतील कामे पूर्ण होईपर्यंत पुरवठा अशक्य

एकीकडे पाण्याची मागणी वाढली असताना पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोजचे दहा एमएलडी पाणी उसने घ्यावे लागत आहे. तेही कमी मिळत आहे. मात्र सिडकोकडूनही दररोज पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी कपात करावी लागत आहे.

हेही वाचा – तळोजात उग्र दर्प

रानसई धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. मात्र हा उंचीचा प्रस्ताव दहा वर्षांपासून गुलदस्त्यात आहे. मात्र त्यामुळे उरणच्या नागरिकांना उसने पाणी व नोव्हेंबरपासूनच कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. रानसई धरणातील पावसाचे पाणी थांबल्याने धरणाची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी ही पाणी कपात केली जात असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: December starts with water cut in uran midc will cut water for two days in a week ssb