पनवेल : शीव-पनवेल या ३० किलोमीटर अंतरावर पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी १८ भुयारी मार्ग बांधण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून हे भुयारी मार्ग वापराविना असल्याने त्याचे तोडकाम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. शीव पनवेल महामार्ग रुंदीकरण व काँक्रीटीकरणासाठी नेमलेल्या सल्लागार समितीने चुकीचा सल्ला देऊन त्याची अंमलबजावणी करणाऱ्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने हा खर्च सरकार कोणाकडून वसूल करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
शीव-पनवेल महामार्गावरील प्रवास जलदगती करण्यासाठी हा आठ पदरी महामार्ग काँक्रीटचा बांधण्याचे नियोजन आखण्यात आले. नियोजनकर्त्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची आखणी केली. मुंबईतील चेंबूर येथील बीएआरसी ते कळंबोली सर्कल या पल्यापर्यंत १८ विविध भुयारी मार्ग बांधण्यात आले. महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामावेळी हा भुयारी मार्ग वापरात येणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अभियंत्याना सुद्धा होती. मात्र सचिवालयातील वरिष्ठांमुळे हे भुयारी मार्ग बांधण्यात आल्याचे समजते. बांधकामावेळीच या मार्गात १० ते १५ फूट पाणी साचत होते. नवी मुंबई परिसरात खाडी क्षेत्रावर माती व राडारोड्याचा भराव टाकून शहरे उभी केली आहेत. कांदळवनाक्षेत्राला लागून असलेल्या या महामार्गातील भुयारी मार्ग समुद्रसपाटीपेक्षा खोल असल्याने त्यामध्ये पाणी साचणे हे नित्याचे होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागातील काही वरिष्ठांच्या आदेशामुळे महामार्गावर ही डासांची उत्पत्ती केंद्रे जाणिवपूर्वक बांधण्यात आली.
भुयारी मार्गांमुळे महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचा खर्चही वाढला. १८०० कोटी रुपये खर्च महामार्गाच्या हस्तांतरणावेळी २२०० कोटींवर गेला. तब्बल १२ वर्षानंतर १८ भुयारी मार्ग विना वापर असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थांना जाग आली. त्यानंतर शनिवारपासून हे भुयारी मार्ग पूर्णत: पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या कळंबोली सर्कलच्या विस्ताराचे काम सुरू असून कामोठे व कळंबोली येथील भुयारी मार्ग तोडण्याचे काम सुरू आहे.
चौकशीची मागणी
सरकारी यंत्रणेला ज्या सल्लागार कंपनीने रुंदीकरणावेळी भुयारी मार्ग बनविण्याचा सल्ला दिला. तसेच ज्या कंपनीने या भुयारी महामार्गाची आखणी केली आणि हा महामार्ग बांधताना ज्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे भुयारी मार्ग बांधले त्या सर्वांची सखोल चौकशी झाल्यास हे भुयारी मार्ग नेमके कोणासाठी बांधले याचा शोध लागू शकेल. संबंधित कामात भ्रष्टाचार झाला असल्यास दोषींकडून या बांधकामाची रक्कम वसूल करण्याची मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी केली आहे.