नवी मुंबई; नवी मुंबईत रिक्षांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे कमी अंतर असल्याने भाडे नाकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे तसेच वाहतूक नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांची संख्याही तुलनेने मोठीच आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून या कारवाईत २ हजार १४२ बेशिस्त रिक्षाचालकांकडून ३ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नवी मुंबईत रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने १ ते २३ मे दरम्यान एक विशेष मोहीम राबवली. यात भाडे नाकारणाऱ्या ८५७ रिक्षाचालकांवर कारवाई करून ४८ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे १ हजार २८५ रिक्षाचालकांवर कारवाई करून ५५ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. अशा एकूण २ हजार १४२ रिक्षाचालकांवर कारवाई करून ३ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच वाहतूक नियम पायदळी तुडवणारे, भाडे नाकारणारे रिक्षाचालक असतील तर नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.

तिरुपती काकडे (पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा)