नवी मुंबई – नवी मुंबई शहरात पावसाचा कहर सुरू असून जोरदार पावसामुळे शहरातील सीबीडी भागात दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले आहे सीबीडीतील सेक्टर ४,५,६ या परिसरातील हजारो दुकानांमध्ये व घरांमध्येपाणी शिरल्यामुळे दुकानदारांची तसेच नागरिकांची तारांबळ उडाली आहे . यापूर्वीही २०२१ मध्ये या विभागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याची घटना घडली होती.
सीबीडी हा परिसर सखल भागात असल्याने सेक्टर १२ येथे असलेल्या पंपिंग स्टेशन वरून या विभागातील पाणी उचलून खाडीत सोडले जाते. परंतु सीबीडी सेक्टर १२ येथे असलेल्या पंपिंग स्टेशनचे काम नव्याने करण्यात येणार असल्याने हे पंपिंग स्टेशन तोडण्यात आले आहे .त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्व पालिकेने खबरदारी न घेतल्याने फक्त एकच पंप लावण्यात आला असून सीबीडी भागातील पाणी उपसा न झाल्याने हजारो दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. या घटनेला पालिकेचे पालिकेचे अधिकारी जबाबदार असून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही
नवी मुंबईतील सीबीडी भागात २०२१ मध्ये अशाच प्रकारे पाणी शिरले होते .त्यावेळेला आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर येथील काम करण्यात आले होते. परंतु आता सीबीडी सेक्टर १२ येथील पंपिंग स्टेशन तोडून नव्याने काम काढण्यात आले असून त्या ठिकाणी चार ते पाच पंप लावण्याची आवश्यकता असताना फक्त एकच पंप लावल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे .पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे.
डॉक्टर जयाजी नाथ, माजी सभागृह नेता