नवी मुंबई : एपीएमसी बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ ते ४ पटीने हापूस पेट्यांची आवक वाढली होती. मात्र आता एपीएमसीत आवक कमी होत असून, मागील वर्षी एप्रिलमध्ये साधारणत: ७० ते ८० हजार पेट्या दाखल होत होत्या. मात्र शनिवारी २९ हजार ८६ पेट्या दाखल झालेल्या आहेत. तर दुसरीकडे इतर राज्यांतील आंब्याच्या ४५ हजारहून अधिक पेट्या दाखल झाल्या असून, इतर राज्यांतील आवक मात्र वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एपीएमसी बाजारात जानेवारी- फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडी करता प्रसिद्ध असलेला हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली, परंतु उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हवामान बदल आणि पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी वेळेआधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन दाखल होत होते. त्यामुळे दरातदेखील घसरण झाली होती. परंतु, आता बाजारात पुन्हा हापूसची आवक रोडावली असून, पुन्हा हापूसची दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी एपीएमसी बाजारात प्रतिपेटी २ हजार ते ४ हजार ५०० रुपये दराने विक्री झाली आहे. तर दुसरीकडे इतर राज्यांतील आंब्याचा हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. यंदा मागील वर्षी एप्रिलच्या तुलनेत यंदा हापूस आवक कमी होत आहे. मागील वर्षी एप्रिलपासून एपीएमसीत हापूसच्या ७०-८० हजार पेट्या दाखल होत होत्या, परंतु आज शनिवारी बाजारात हापूसच्या २९ हजार ८६ पेट्या, तर इतर आंब्यांच्या ४५ हजार ३११ पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिपेटी दरात ५०० रुपयांनी वाढ झाली असून, प्रतिपेटी २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी विक्री होत आहे. तर इतर आंबे यामध्ये बदामी प्रतिकिलो ७०-९० रुपये, लालबाग ६०-७० रुपये, तर कर्नाटक हापूस ८०-१५० रुपये किलोने उपलब्ध आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : एपीएमसीत कांद्याच्या दरात घसरण

हेही वाचा – नवी मुंबई : वाशी गावात अनधिकृत गोशाळेवर वन विभागाची कारवाई

मे महिन्यात आवक आणखीन कमी होणार

दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते, परंतु हापूस प्रेमी, खवय्ये मे महिन्याची आतूरतेने वाट पाहत असतात. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात, शिवाय परिपक्व हापूस दाखल होतो. तसेच दरही आवाक्यात असतात, त्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहकांची पावले हापूस खरेदीकडे वळतात. दरवर्षी हे चक्र सुरू असले तरी यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण होणार आहे. दरवर्षी मे महिन्यात ९० हजार ते १ लाख पेट्या दाखल होत असतात, मात्र यंदा अवकाळी पावसाने उत्पादनावर परिणाम झाला असून, मे महिन्यात हापूसच्या अवघ्या २५ हजार पेट्याच दाखल होतील, तसेच दरही वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती एपीएमसी फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflow of hapus mangoes decreased in apmc market in navi mumbai ssb