उरण : मुंबईतील ससून बंदरावरील ताण कमी करण्यासाठी उरणच्या करंजा येथे नवे मच्छिमार बंदर उभारले जात असून कंत्राटदाराने ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने २१४ दिवसांच्या दिरंगाचे दर दिवसाचे १ लाख ५५ हजार ५५६ नुसार ३ कोटी ३२ लाख ८८ हजार ९८४ रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच बंदराचे काम येत्या मार्च अखेर पर्यंत पूर्ण करून बोर्डाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उरणसह रायगड मधील मच्छिमारांसाठी महत्वाचे असलेले करंजा बंदर लवकरच सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई एमआयडीसीतील महापे परिसरात ‘पाणीबाणी’ कायम; एक वर्षापासून अनियमित पाणीपुरवठा

स्वातंत्र्य पूर्व काळात मुंबईत उभारण्यात आलेले ससून डॉक हे मच्छिमार बंदर राज्यातील मच्छिमारांचा व्यवहार करण्यासाठीचे बंदर अपुरे पडत असल्याने तसेच रायगड मधील मच्छिमारांना मासेविक्रीसाठी उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारण्यात येत आहे. या बंदरासाठी सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या समान भागीदारीतून हे बंदर उभारले जात आहे. ७५ कोटी वरून  १५० कोटीवर या बंदराचा खर्च पोहचला आहे. मात्र या बंदराच्या कामकाजात सुरुवाती पासूनच दिरंगाई व बंदराच्या कामातील निकृष्ट दर्जाच्या तक्रारी येथील मच्छिमार व त्यांच्या संस्थांनी मेरिटाइम बोर्डाकडे केल्या आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात नवीन बटाटा हंगामाने दर घसरण

यामध्ये बंदराच्या भरावात चिखल मातीचा भराव केला जात असल्याची तसेच कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे फिशरमन काँग्रेसचे कोकण विभागीय अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी केली होती. त्याची चौकशी करण्याचे आश्वासन बोर्डाने दिले होते त्याची अंमलबजावणी केली असल्याचे मत नाखवा यांनी व्यक्त केलं आहे.  करंजा बंदराचे काम विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने कंत्राटदाराला दंड केला आहे. तो त्यांच्या कडून वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे मार्च अखेर पर्यंत बंदराचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी दिली आहे. २ फेब्रुवारीला बोर्डाने पत्र देऊन कंत्राटदाराला दंड आकारण्याची माहिती दिली आहे. यामध्ये करोना काळात सूट दिल्या नंतर ही कामाचा दर्जा व काम पूर्ण करण्यासाठी सूचना देऊनही काम वेळेत झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पर्यंत बंदराचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित १५ टक्के काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karanja fisherman jetty contractor fined rs 3 5 crore for delay in work zws