नवी मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समाविष्ट करण्यात आली असून आता गावांना मूलभूत आणि प्राथमिक सुविधा महापालिकेतर्फे देण्यात येणार आहेत. विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि समितीचे सर्व पदाधिकारी यांनी आयुक्तांची भेट घेऊन गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केल्यानंतर १४ गावांत प्राथमिक आणि मूलभूत सुविधा सुरू करण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांची ही मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावात मूलभूत सुविधांचा वानवा आहे. आरोग्य, पाणी, रस्ते, शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश व्हावा यासाठी ग्रामस्थ आणि १४ संघर्ष समिती मागील अनेक वर्षे मागणी करत होते, अखेर ही गावे महापालिकेत समाविष्ट झाली असून याठिकाणी आता मूलभूत, पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. नवी मुंबई महापालिकेत १४ गावे समाविष्ट असताना गावांचा मूलभूत विकास झाला होता. मात्र नवी मुंबई महापालिकेतून वगळताच गावे मूलभूत, पायाभूत सुविधांपासून वंचित राहिली. त्या गावात आरोग्य सुविधा नाही, पायाभूत सुविधा, रस्ते, शाळा, पाण्याची समस्या आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणी नवीन परिमंडळ देखील स्थापन केले आहे. १४ गावांत आपला दवाखाना, पाच आरोग्य केंद्रे, स्वछता, फवारणी, शाळेतील विध्यार्थ्यांना गणवेश पुरवठा, बस सेवा या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

हेही वाचा – स्थानक सफाईवरून रेल्वे-सिडको यांच्यात टोलवाटोलवी, सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

महापालिकेतून बाहेर पडताच नागाव येथील प्रथम नागरी आरोग्य केंद्र अडगळीत पडले असून आजमितीला या आरोग्य केंद्राचे पडीक इमारतीत रुपांतर झाले आहे. या ठिकाणी देखील तात्पुरत्या स्वरुपात नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचे नियोजन आहे, तर नेवाळी गावात महापालिकेचे माता बाल रुग्णालय होते मात्र त्याचीही इमारत वापराविना पडकी झाली आहे. पुन्हा माता बाल रुग्णालय उभारण्याचे प्रस्तवित आहे.

आमदार राजू पाटील यांच्यासमवेत महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले. नागाव गावात विभाग कार्यालय होणार आहे. – लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, १४ गाव विकास समिती

हेही वाचा – नवी मुंबई : पोक्सोअंतर्गत दोन दिवसांत चार गुन्हे

नागावमध्ये विभाग कार्यालय

नागाव ग्रामपंचायत इमारतीत नवी मुंबई महापालिकेतर्फे ग्रामपंचायत दप्तरी विभाग कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. १४ गावांत आरोग्य सुविधा नाहीत. पायाभूत सुविधा, रस्ते, शाळा, पाण्याची समस्या आहे. हे सुरू केल्यानंतर त्या १४ गावांमध्ये पाणी, आरोग्य सुविधा, बस सेवा, रस्ते या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. नागाव महपालिकेत समाविष्ट असताना या ठिकाणी प्रथम नागरी आरोग्य केंद्र उभारले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai fourteen villages will soon get facilities instructions for setting up your clinic health centers ssb