नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात आता रमजान निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फळांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच हापूसचा हंगामाही सुरू होत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. मात्र बाजारात या कचऱ्याचे नियोजन होत नसून दोन-तीन दिवस कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी असल्याने बकालपणा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फळ बाजारातील हापूस निर्यात होणाऱ्या इमारती जवळच कचऱ्याचे ढीग साचत आहेत. तसेच या समोरील असणाऱ्या उपहारगृहामध्ये शिजवलेले अन्न उघड्यावर ठेवून एकंदरीत बाजार घटकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. यावर एपीएमसी प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबई शहरात काही वर्षांपूर्वी ठिकठिकाणी कचराकुंड्या होत्या. परंतु बहुतांशी ठिकाणी कचरा रस्त्यावरच अस्ताव्यस्त टाकला जात होता. त्यामुळे रस्त्यावर आणि परिणामी त्या विभागात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य होते. स्वच्छता सर्वेक्षण अभियानाअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून शहरातील कचरा कुंड्या हटविण्यात आल्या. त्याऐवजी आता कचरा वाहून नेण्यासाठी घंटा गाडी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. मात्र आजही एपीएमसीत आणि बाजाराबाहेरील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आढळत आहेत.

पीएमसी बाहेर अनधिकृत फेरीवाले बसून त्याच ठिकाणी सडलेली, खराब झालेले भाजी, फळे, अन्य कचरा रस्त्यावरच टाकून जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच दुर्गंधी आणि घाणीचे दृश्य असते. तर एपीएमसीच्या अंतर्गत भागात देखील वेळोवेळी कचरा न उचलल्यामुळे कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना तसेच बाजार घटकांना नाक मुठीत धरून वावरावे लागते.

उपहारगृहात अन्नपदार्थ उघड्यावर

फळ बाजारातील या निर्यात भवन इमारती समोर असलेल्या उपहारगृहाला जेवढी जागा देण्यात आली होती, त्याव्यतिरिक्त अधिक पटीने अतिक्रमण करून जागेचा वापर सुरू आहे. शिवाय या ठिकाणी उघडपणे शिजवलेला भात टेबलवर टाकण्यात आल्याचे दिसून येत आहेत. याच परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे या ठिकाणी माशा तसेच उंदरांचा उपद्रव देखील आहे. त्यामुळे उपहारगृहामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.

एपीएमसीतील कचरा नियोजनाबाबत येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय पटलावर घेण्यात येणार आहे. तसेच उपहारगृहामध्ये उघड्यावर ठेवलेल्या अन्नाबाबत चौकशी करून अहवाल मागविण्यात येणार आहे.पी एल खंडांगळे, सचिव, एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai garbage is piling up near fruit market and open food storage threatens health sud 02