उरण : मोरा ते मुंबई व दरम्यान रो रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम २०१८ सालापासून रखडले आहे. त्यानंतर जेट्टीचे काम अनेक महिने बंद होते. या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा दावा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या नव्या मुहूर्तावर तरी ही सेवा सुरू का असा सवाल केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विलंबामुळे या जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. यातील रेवस जेट्टीच्या कामात पाच कोटींच्या खर्चात वाढ झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीचे काम करण्यात येत आहे. या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या रो रो मार्गावरील भाऊचा धक्का ही जेट्टी कार्यान्वित झाली आहे.

मात्र मोरा जेट्टीचे काम सहा वर्षांपासून रखडले आहे. हे काम रखल्याने ५० कोटींच्या कामाची रक्कम ७५ कोटींवर पोहचली आहे. तरीही जेट्टीचे काम अपूर्णच असून जेट्टीपर्यंत जाण्यासाठी मार्गही होऊ शकलेला नाही. उरण हा समुद्र आणि खाडी मार्गाने मुंबई आणि अलिबाग यांना जोडता यावा यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जलसेवा सुरू आहे. मात्र या मार्गाने वाहन घेऊन प्रवास करता यावा याकरिता रो रो सेवा सुरू करण्याचा मानस आहे. हे काम वारंवार बंद होऊन रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होणार का असा सवाल आता या मार्गावरील प्रवासी करू लागले आहेत.

खरंच हे जलमार्ग सुरू होणार का?

मोरा-मुंबई व अलिबाग आणि उरणला जोडणाऱ्या रेवस ते करंजा मार्गावरील रो रो सेवा खरंच सुरू होणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उरणला मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूमुळे मुंबईत वाहने घेऊन जाणारे या सेतूचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे या जल मार्गावरील रो रो सेवा चालणार का अशीही शंका आहे. मोरा जेट्टीचे काम लवकरच सुरू करण्यात आले असून मार्च २०२६ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ro ro services from mumbai city to mora likely start by 2026 zws