लोकसत्ता टीम
नवी मुंबई: महिला कोणतेही काम अत्यंत जबाबदारीने करतात. स्वच्छतेमध्ये तर महिलाच आघाडीवर असतात. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला स्वच्छोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वच्छता संग्राम रॅलीत एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे व मुलींचे कौतुक करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई शहर महाराष्ट्रात नंबर वन आहेच आता आपला उत्साह पाहून देशातही आपण नक्कीच नंबर वन होऊ असा विश्वास व्यक्त केला.
स्वच्छता कार्यातील महिलांचा सहभाग आणि त्यांचे नेतृत्व वृध्दींगत व्हावे यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देश पातळीवर ‘स्वच्छोत्सव २०२३’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या अनुषंगाने कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शून्य कचरा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई
गणपतशेठ तांडेल मैदानापासून सुरु झालेली ही ५ हजाराहून अधिक सहभागी महिला व विद्यार्थिनी, विद्यार्थी यांची ही ‘स्वच्छता संग्राम रॅली’ डी मार्ट समोरून सेक्टर ४०, ४२ मधील रस्त्याने सिवूड ग्रॅंड सेंट्रल मॉल मार्गे नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पोहचली. या रॅलीमध्ये स्वच्छता संदेशांचे फलक झळकवित स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा दमदार प्रचार करण्यात आला. त्यासोबतीने कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक वापराला प्रतिबंध अशा स्वच्छताविषयक विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून रॅलीला सलामी दिली. अनेकजण काही काळ रॅलीत सहभागीदेखील झाले. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे रॅलीची सांगता होत असताना ‘ओलू, सुकू व घातकू’ या कचरा वर्गीकरणाविषयी हसतखेळत संदेश देणाऱ्या आरंभ क्रिएशन्स प्रस्तुत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित हजारो महिला व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. उपस्थित सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून हात उंचावून हलवत स्वच्छतायात्री बनून नवी मुंबईला देशात नंबर वन बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.