पालघर : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीसाठी ३८३२ जागांसाठी १०५५४ उमेदवारी अर्ज आले असून या अर्जाची बुधवारी छाननी करण्यात आली. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दोन दिवसांत तब्बल ९१ टक्के इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करताना विविध दाखले मिळवण्यासाठी व दाखले अपलोड करण्यासाठी उमेदवारांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले होते. शिवाय पितृपक्षात अर्ज दाखल करण्याऐवजी त्यानंतर दाखल करण्याकडे अनेक उमेदवारांचा कल राहिल्याने २६ सप्टेंबर रोजी ४९०४, तर २७ सप्टेंबर रोजी ४७३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जाची छाननीदरम्यान दाखले व इतर कागदपत्रांची वैधता पडताळणी करण्यात आली. पालघर, वाडा, डहाणूत उमेदवारी अर्ज पडताळणीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शासकीय जमिनीवर अतिक्रमण वादाचा मुद्दा शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा पुरावा असल्यास व त्याबाबत आक्षेप नोंदवला गेल्यास उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र छाननीदरम्यान बाद ठरवण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी यांना असल्याने काही ठिकाणी असे आक्षेप नोंदविण्यात आले. वादात अडकलेल्या अर्जदारांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित महसूल अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक नोटीस काढण्याचे प्रत्यारोप केले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत या मुद्दय़ावर प्रथमच मोठय़ा संख्येने आक्षेप नोंदवले गेले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शासकीय जागेवरील अतिक्रमण हा वादाचा मुद्दा ठरणार आहे. छाननीच्या दिवशी गर्दी, गोंधळ उमेदवारांची तहसील कार्यालयावर एकच झुंबड उडाली. छाननीचा दिवस असल्याने आपण काही कागदपत्रे चुकीची दिली नाहीत ना किंवा आपल्या विरोधात कोणी आक्षेप तर घेतला नाही ना अशा अनेक विचारांची घालमेल उमेदवारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. उमेदवारांसह त्यांचे मार्गदर्शक राजकीय पदाधिकारी गावातील राजकीय मंडळी अशा अनेकांनी कार्यालयावर एकच गर्दी केली होती. आपल्या गावातील कोण सदस्य छाननीदरम्यान बाद झाला व कोणा विरोधात आक्षेप आहे का? याची उत्सुकता होती. अर्ज भरण्यासाठी एक हजार रुपये निवडणुकीत आरक्षित पदांसाठी शंभर रुपये तर खुल्या गटासाठी पाचशे रुपये इतकी अनामत रक्कम असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी साडेसातशे ते एक हजार रुपये उमेदवारांना मोजावे लागले. एक अर्ज भरण्यासाठी किमान २० मिनिटे लागत असल्याने विविध ठिकाणी रांगा होत्या. उमेदवारीसाठी आलेले अर्ज तालुका सरपंच सदस्य डहाणू ३७८ १९९७ पालघर ४२९ २४०८ तलासरी ६२ ५२२ वसई ६५ ३९४ वाडा १८६ ७८८ विक्रमगड ३०९ १०७७ जव्हार २५७ ९९२ मोखाडा १६८ ५२२ एकूण १८५४ ८७००