कासा: डहाणू शहराच्या हद्दीतून वाहणारी कंक्राडी नदी सांडपाण्यामुळे गटारगंगेमध्ये रूपांतरित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे या नदीत खाजगी इमारतींमधून थेट सांडपाणी, मलमूत्र आणि घरगुती व व्यावसायिक कचरा टाकला जात आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नदीचे संपूर्ण विद्रूपीकरण झाले आहे.
शहरातील के.टी. नगर, ईराणी रोड आणि जलाराम मंदिर परिसरातील अनेक रहिवासी आणि व्यापारी हे इमारती सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन न करता ते मलमूत्र मिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. नदीचे पाणी काळसर व दुर्गंधीयुक्त झाले असून परिसरात मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संध्याकाळच्या वेळेस नागरिकांना मच्छरदंशाचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवत आहे.
शहरात झपाट्याने वाढत असलेल्या नागरीकरणामुळे रहिवासी संकुले आणि व्यावसायिक इमारतींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. मात्र त्याप्रमाणात सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाची कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी थेट कंक्राडी नदीत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व अन्य घनकचरा टाकला जात आहे. गेल्या आठवड्यापासून नदीकाठच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी जाणवत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे जलाराम मंदिराजवळील पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून, येता-जाता नागरिक सर्रास या नदीत कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले असून नदीकाठच्या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत डहाणू नगरपरिषदेचे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा निवेदने दिली. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे “स्वच्छ व सुंदर डहाणू” या घोषणांचे केवळ फलकच उरले असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य असल्याचे चित्र आहे.
कंक्राडी नदीत थेट सांडपाणी व कचरा सोडणाऱ्या खाजगी इमारतींच्या मालकांवर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर लवकरच आरोग्याच्या गंभीर समस्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाच सहा दिवसापूर्वी कंत्राटी नदीतील गाळ काढण्याचे काम केले गेले. पुन्हा पावसाळा पूर्वी या नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाईल. कुठेही गाळ साचून नागरिकांना त्रास होऊ नये त्याचप्रमाणे अंतर्गत गटार देखील सफाई मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे.
अक्षय गुडदे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद