पालघर – पालघर पश्चिमेकडील देवीसहाय मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीचे झाकण गेल्या दोन दिवसापासून निघाले असून लोखंडाचे असलेले हे झाकण धोकादायक स्थितीत ठेवण्यात आले आहे. दिवसभर सुरू राहणाऱ्या या वाहतुकीच्या रस्त्यावर त्या उघड्या व धोकादायक गटारीमुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जुना पालघर येथून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या देवीसहाय मार्गावर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत सतत वाहतूक सुरू असते. या भागात असलेल्या घाऊक किराणामाल दुकानांमध्ये माल उतरवण्यासाठी दिवसभर वाहनांची रेलचेल सुरू असते. याशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, बाजारपेठ, भांडी भंडार व शेकडो दुकाने या मार्गावर असल्याने तसेच हा रस्ता हुतात्मा चौकाकडे जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी देखील सतत होत असते.

देवीसहाय मार्गावरून भाजी बाजार व पाटकर गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या टोकावरच उंचवटा असून येथून भुयारी गटार गेलेले आहेत. मात्र या तीन रस्त्यांच्यामध्ये दीड ते दोन मीटर चौरस गटारीच्या पत्र्याचे झाकण गेल्या अनेक वर्षापासून सुस्थितीत नव्हते. मात्र गेल्या दोन दिवसा अगोदर हे झाकण पूर्णतः तुटून ही गटार उघडी पडली आहे. मुख्य म्हणजे हा वाहतुकीचा रस्ता असल्याने व हे गटार रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दोन दिवसापासून तुटलेल्या अवस्थेत असलेल्या या गटारामध्ये कोणी पडू नये याकरिता येथील स्थानिकांनी गटाराच्या चारी बाजूने वाहन चालकाच्या निदर्शनास येईल असे विटांचे व दगडाचे तुकडे ठेवले आहेत. मात्र रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यास या ठिकाणी दुचाकी अथवा अन्य वाहन पडून मोठा अपघात होण्याची शक्यता दुकानदार व वाहतूकदारांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत नगर परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संबंधित काम हे देखभाल दुरुस्ती मध्ये असून या रस्त्याचा ठेकेदार गौरव साळुंखे यांना याबाबत कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर शहरात विकास कामे होत असताना अशा प्रकारे गटार उघडे पडत असेल व या गटारीमुळे एखाद्याचा जीव गेला तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जाब विचारायचा. दोन दिवसापासून उघड्या असलेल्या गटारीच्या रस्त्याने अनेक प्रशासकीय कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते प्रवास करत असतील. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.