लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित आपत्कालीन कवायत अभ्यासासाठी सुरू असताना त्याअंतर्गत अधिकारी वर्गाला प्रसारित करण्यात आलेला संदेश नागरिकांपर्यंत समाज माध्यमावरून पोहोचल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानीय पुढारी, लोकप्रतिनिधी तसेच शाळा व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांकडून या संदेशाच्या पडताळणीसाठी प्रयत्नशील आहेत. या आपत्कालीन कवायतीची (मॉक ड्रिल) नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे पूर्व सूचना देण्यात आली नसल्याने पालघर तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्रातील अणभट्टीमध्ये किरणोत्सर्ग पसरवणाऱ्या रेडिओधर्मी पदार्थाची गळती झाली असून परिसरातील २७-२८ गावांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या मॉक ड्रिल दरम्यानचा अधिकारी वर्गापर्यंत मर्यादित राखण्याचे अपेक्षित असणारा अंतर्गत संदेश शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांपर्यंत समाज माध्यमां वरून प्रसारित झाला. या संदेशाच्या पहिल्या ओळीत “ऑफसाईट आपत्कालीन अभ्यासाकरिता” असे स्पष्टपणे नमूद असताना त्याच्याकडे लक्ष न देता हा संदेश समाजवाद माध्यमांवर वायरल झाल्याने परिसरात घबराहट पसरली.
परिणामी नागरिकांमध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्रातून किरणोत्सर्ग पसरल्याची भावना निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले. यामुळे शाळा, महाविद्यालयात असणाऱ्या आपल्या पाल्यांना घरी घेऊन येण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू झाले असून प्राचार्य व मुख्याध्यापक यांना पालकांच्या फोनचा भडीमार होऊ लागला आहे. याखेरीस स्थानीय राजकीय पुढारी, नेते व नागरिकांनी शासकीय पातळीवर तसेच पत्रकारांना घटनेच्या सत्यतेबाबत प्रश्नांचा भडीमार करून सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या विषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता आज सकाळी तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्या चे भासवून प्रथम ऑन साईट व नंतर ऑफसाईट इमर्जन्सी अर्थात अणुऊर्जा केंद्राच्या बाहेर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचे भासवून बचाव कार्याची कवायत सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. या अभ्यासासाठी केलेला जाणाऱ्या कवायती मध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी अंदाजीत वेळे च्या तुलनेत प्रत्यक्षात किती वेळ लागतो, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कामांचा निपटारा कशा पद्धतीने होतो व बचाव कार्याच्या आराखड्यात सुधारणा करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा अभ्यास केला जात असल्याचे सांगण्यात आले. पालघर तालुक्यात सुरू असलेली आपत्कालीन कवायत ही अभ्यासासाठी मर्यादित असल्याचे तसेच कोणत्याही प्रकारची गळती अणुऊर्जा प्रकल्पात झाली नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी लोकसत्ता कडे केला आहे.
या शासकीय अधिकारी कर्मचारी व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या अंतर्गत कवायती दरम्यान प्रसारित करण्यात येणारा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसा पोहोचला याची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवरुद्ध कारवाई करण्याची असेही जिल्हाधिकारी यांनी लोकसत्तेला सांगितले.
संदेशात काय म्हटले होते
शासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अंतर्गत संदेशात असे सुचित करण्यात आले होते की, “तारापूर साईट अनुभट्टी मध्ये रेडिओधर्मी पदार्थ निघालेला असून ठराविक सेक्टर मधील २७-२८ गावे (गावांची नाव) बाधित झालेली असून रेडीयेशन पसरलेले आहे. जनतेला आव्हान करण्यात येते की तोंडाला ओला रुमाल, ओढणी किंवा मास घालून घरातच थांबावे. उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे.”
१९८९ मध्ये देखील पसरली होती भीती
१९८९ मध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्रात मॉक ड्रिल केले जाणार असल्याचे माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी माहिती प्रसारणाची माध्यम मर्यादित असल्याने अफवांना पीक आला होता व नागरिकांना अणुभट्टीत प्रत्यक्षात छिद्र पाडून (ड्रिल करून) करून काही चाचणी केली जाणार असल्याचा समज झाल्याने बहुतांश नागरिकांनी घरदार सोडून कोंबड्या, बकऱ्या, गुर विकून जिल्ह्याबाहेर पलायन केले होते. त्यानंतर ज्या भागात कवायत केली जात असे त्या भागातील नागरिकांना आगाऊ सूचित करून मर्यादित स्वरूपात मॉक ड्रिल केले जायचे. मात्र अशा कवायती फक्त दिखाव यापुरता आयोजित केल्या जातात असे प्रसार माध्यमांनी अनेकदा टीका केल्याने अशा मॉक ड्रिल विषयी माहिती अंतर्गत ठेवण्याचे योजिले जाऊ लागले. यावेळी देखील जिल्हा प्रशासनाने माध्यमांना अथवा परिसरातील लोकांना आगाऊ सूचना देण्याचे टाळल्याने पुन्हा एकदा १९८८ सारखा नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले.
© The Indian Express (P) Ltd