कासा: पालघर जिल्ह्यामध्ये बुलेट ट्रेन, द्रुतगती महामार्ग, मालवाहतूक रेल्वेसेवा अनेक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली आहे. वृक्षतोड झाल्याने जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा निवास असलेले जंगले नष्ट झाल्यामुळे जंगलातील प्राण्यांचा अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत वावर वाढायला सुरवात झाली आहे. दोन महिन्यापूर्वी डहाणू कोसबाड या भागामध्ये बिबट्या चा वावर पहायला मिळाला होता तसेच पालघर तालुक्यामधील ढेकाळे परिसरात पोल्ट्री फार्म, शेळीपालन या ठिकाणी सुद्धा लांडगा, तरस तसेच बिबट्या यांनी हल्ला केल्याचा घटना घडल्या आहेत. वन्यप्राण्यांनी हल्ला करत कोंबड्या व बकऱ्यांची शिकार करत जीव घेतला होता.
जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पामुळे जंगल नष्ट होत असल्यामुळे हिंसक प्राणी अन्नाच्या व पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये दिसून येत आहेत व हल्ले करत आहेत. महालक्ष्मीगड परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात माकडे राहतात. मागील महिन्यात दोनतीन वेळा या जंगलात आग लागण्याच्या घटना घडल्या त्यामुळे या भागातील माकडे परिसरातील चारोटी, कासा या भागात वावरताना आढळून आले.
गेल्या १४ दिवसापासून तलासरी तालुक्यामध्ये करजगाव आणि धामणगावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यासह वन विभागाचा कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर गुजरात मधील वलसाड येथे उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी सकाळी करजगाव येथे चिकूच्या वाडीत काम करत असताना गुलाब मधु वरठा या महिलेवर झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला आणि पाठीवर, मानेखाली गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र, धाडसाने त्यांनी आरडा ओरड करत बिबट्याला पळवून लावले. या घटनेनंतर काही वेळातच धामणगावातील मिर्ची लागवड केलेल्या शेतात काम करत असलेल्या राज्या काकड्या चिमडा या शेतकऱ्यावर देखील बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात राज्या यांच्या हातावर, पोटावर, पायावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. तर वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावत असताना वन कर्मचारी शैलेश धर्मामेहर यांच्यावर हल्ला केला त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाले आहे. बिबट्याच्या या सलग तीन हल्ल्यांमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.
करजगाव येथे बिबट्याच्या वावर, करजगाव येथील शेतकऱ्याच्या ससे पालन युनिट मधील ५० ते ६० ससे बिबट्याने मारले, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरा शेजारील ससे ठेवलेल्या युनिट मध्ये शिरला बिबट्या.परिसरात भीतीचे वातावरण, ग्रामस्थांकडून बिबट्याला पकडण्याची मागणी. आठ दिवसापूर्वी याच बिबट्याने एक महिलेसह दोन पुरुषांना केले होते जखमी. बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी.हल्ल्यानंतर बिबट्या गावातच थांबून राहिला होता. तो यशवंत चिंमडा यांच्या घराशेजारील कोंबड्याच्या खुराड्यात लपून बसलेला आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या उन्हाचे चटके तीव्र असल्यामुळे शेतकरी पहाटेच शेतात कामासाठी जातात. मात्र, बिबट्याच्या या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी संबंधित ठिकाणी सात तासांपासून जाळी लावून सापळा रचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वनविभागाच्या निष्काळजी पना आणि अपुरे साधन साहित्य तसेच बिबट्याला बेशुद्ध न करता पकडण्याचा प्रयत्न वनविभागाच्या अंगलट आला. यामुळे बिबट्याने जाळी तोडून थेट वन रक्षक शैलेश धर्ममेहेर ह्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करत जंगलात धूम ठोकली. यामुळे सकाळ पासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सहकार्य करणारे स्थानिक चांगलेच आक्रमक झाले होते. ह्यावेळी ग्रामस्थानी भीती व्यक्त करत वनविभागाचा सहाय्यक वन रक्षक अधिकारी प्रियांका पाटील , वन परिक्षेत्र अधिकारी राजेश सरनिकर ह्यांचा निष्काळजी मुळेच बिबट्या पसारा झाला असून पुढे काही घटना घडल्यास किंवा कुणाचा जीव गेल्यास वन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.