वाडा : दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्या नंतर सुरू होणारा पावसाळा “मे” पासूनच सुरू झाल्याने आठवडा बाजारांवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. वाडा तालुक्यातील कुडूस, खानिवली, शिरीष फाटा, गोऱ्हे शिवाय विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वसई या तालुक्यांत ठिकठिकाणी भरणारे आठवडा बाजार किंवा पावसाळा सुरु होण्यापूर्वी एक महिना आधीच विविध वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ यांच्यावर पावसाने विरजन पडल्याने व्यापारी आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडताना दिसून आली. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. हा आठवडा पावसाळ्यापूर्वीचा शेवटचा बाजार ठरला आहे.

पावसाळयात शेती हंगामात न मिळणा-या वस्तु व त्यावेळेस सा-याच वस्तुंचे भाव चढे असल्याने पावसाळयासाठी व दैनंदिन लागणा-या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्यासाठी येथील आदिवासी व शेतकरी व इतर ग्राहक वर्ग बाजारात दाखल झालेले कांदा, बटाटा, लसूण, कडधान्य, मसाले, सुकी मासळी आदी “अगोठ”ची (पावसाळयापुर्वी) विविध, घरगुती उपयोगी वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाजारात जात असतात.या बाजारात इतर दुकानांमधील वस्तूंचे दरांपेक्षा आठवडा बाजारात कमी भाव, तर याच आठवडा बाजारांतील तुलनेने कमी भाव असलेल्या मोठ्या बाजारपेठेत अधिक ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येतो.

वाडा तालुक्यातील कुडूस ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दर शुक्रवारी आठवडा बाजार तर येथे दरवर्षी मोठा “उरूस” भरत असतो. ही पंचक्रोशीतील सर्वात मोठी बाजारपेठ असुन तिला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या कुडूसमध्ये भरत असलेल्या “उरुसा”साठी पालघर, नाशिक, भिवंडी, कल्याण, वसई आदी ठिकाणांहून व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात.तर वाडा, विक्रमगड, भिवंडी, वसई, शहापूर या तालुक्यांमधून नागरिक, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने विविध वस्तू, घरगुती उपयोगी लागणारे सामान, साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने जात असतात.

कुडूस हि ग्रामीण भागातील नागरिकांची हक्काची असलेली ही मोठी बाजारपेठ असली तरीही शहराकडे नोकरी, व्यवसाय, धंदा, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने स्थलांतरित झालेले नागरिक देखील “मे” महिन्याच्या सुट्टीत गावी आल्यानंतर शहराकडे परतण्यापूर्वी वर्षभराचे लागणारे किराणा किंवा इतर सामान “उरूस” मधून घेऊन जातात. या “उरूसा” मध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याने ग्रामपंचायतीला कराच्या रूपाने मोठे उत्पन्न मिळते.

” मे” महिन्यात कुडुस येथे “उरूस” भरण्यास सुरुवात होत असून हा एक महिनाभर सुरू राहतो. ग्रामपंचायतीकडून “उरूसा” साठी जागा उपलब्ध करून दिली जाते. यात विविध वस्तू, कांदा, लसूण, बटाटे, मिरची, मसाले, हळद, धने, खोबरा, कडधान्य, तेल, तांदूळ अशी अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने थाटलेली असतात.

कुडूस ग्रामपंचायतीकडून सर्व सामान्य जनतेला, शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल असा प्रत्येक घरगुती उपयोगी सामानाचा भाव निर्धारित केला (ठरवला) जातो. यासाठी दरपत्रक प्रसिद्ध केले जाते. किरकोळ किंवा घाऊक वस्तूंसाठी हा दर लागू असुन तो सर्व व्यापाऱ्यांसाठी बंधनकारक असतो.
त्यामुळे एकसमान दर असल्याने ग्राहकाची कुठल्याही व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी करताना फसवणूक होत नाही. त्यामुळे या बाजारपेठेत तालुक्या बाहेरील देखील ग्राहकांची गर्दी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असते.

रोजच्या आहारातील कांदा, बटाटा, लसुन या वस्तुंचा बाजार सध्या तेजीत आहे. बाजारात कांदा १२ ते १५ रुपये किलो दरापासुन ते १० रुपये पर्यंतच्या या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. परंतु हाच कांदा पावसाळयात ६० ते ७० रुपयांच्या दरात विक्री केला जातो.

कुडूस ग्रामपंचायतीकडून ठरविण्यात आलेले वार्षिक बाजारभाव

हळद- २३० रू, धने -१५० रू, राई – १०० रु,

मेथी -१०० रू, जिरे ३०० रु, खोबरे – २७५ रु.

ओवा- २३०, चिंच- १६० रुपये, शेपू – २२० रु.

राजिणे – २४० रुपये

कांदा (लहान)- १२ रू, कांदा (मोठा)- १५ रु,

लसुण (लाल) -१८० रु, लसुण (सफेद)- १०० रु,

महागाईच्या काळात घरगुती उपयोगी वस्तु, किराणा सामान यांचे दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. ग्राहकाला संसाराचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागत आहे. यातच “उरूस”मध्ये खरेदी करणाऱ्या वस्तु, सामनामध्ये दर कमी असल्याने ग्राहकाला काहीसा दिलासा मिळतो. मात्र “मे” महिन्यात पाऊस अनिश्चित पडत असल्याने त्याचा आठवडी बाजारांवर परिमाण झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर ग्राहकांना देखील हवी तशी खरेदी करता आली नाही.

विक्रमगडमध्ये बुधवारी सकाळी पावसाचे काही चिन्ह दिसत नसल्याने विविध भागातुन आलेल्या व्यापाऱ्यांनी विविध वस्तूंची दुकाने थाटली होती, हे सर्व होवुन सुरळीत बाजार चालु असतांनच अचानक जुनच्या पहिल्या पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्याने व्यापारी वर्गाची व ग्राहकांची देखील मोठी तांराबळ उडाली.

मात्र ऐन खरेदी व गर्दीत बाजार चालु असतांना पावसाने जोराची हजेरी लावल्याने त्याचा या आजच्या बुधवारच्या आठवडी बाजारवर मोठा परिणाम होवुन त्याचा फटका विविध भागातुन विविध वस्तु विक्री करीता आलेल्या व्यापाऱ्यांना तर खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या ग्राहकांना बसताना दिसला. बाजारी आठवड्यातील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.

प्रतिक्रिया

मी कांदा बटाटा, लसुन व्यापारी असुन आज आलेल्या अचानक पावसामुळे माझा माल विक्री झाला नाही व तो माल भिजुन माझे मोठे नुकसान झाले आहे. संजय भानुशाली, कांदा बटाटा व्यापारी, विक्रमगड

प्रतिक्रिया

माझे किराणा मालाचे सर्व सामान भिजल्याने नुकसान झाले आहे. तसेच पाउस पडल्याने ग्राहक वर्ग देखील आपल्या घरी गेल्याने मालाची विक्री थांबली. निलेश औसरकर, किराणा व्यापारी, विक्रमगड