लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : वसई तालुक्यापासून पालघर मुख्यालयापर्यंत शीघ्र गतीने प्रवास करण्यासाठी खारवाडेश्री (जलसार) ते मारंबळपाडा (विरार) दरम्यान फेरीबोट रो-रो सेवा उद्या (ता १९) पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. यामुळे विरार ते पालघर तालुक्यातील प्रवास वेळेत तसेच अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते. खारवाडेश्री येथे स्लोपिंग रॅम अर्थात उतार असलेली हंगामी जेट्टीचे काम पूर्ण झाल्याने दोन तालुक्यांदरम्यानची रो-रो सेवा सुरू होणार आहे.
केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. या प्रकल्पाला २६ ऑक्टोबर २०१७ रोजी १२.९२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. नंतर १५ मार्च २०२३ रोजी २३.६८ कोटी रुपयाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराला फेब्रुवारी २०२४ मध्ये काम देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात पर्यावरण विषयक तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून या कामाबाबत परवानगी प्राप्त झाली होती.
नारंगी व चिखलडोंगरी या विरार जवळच्या भागात असणाऱ्या मारंबळपाडा येथील जेट्टी ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण झाली होती. तर या जेट्टीकडे जाणारा पोहोच रस्ता कामासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खारवाडेश्री येथे पाईल जेट्टी उभारण्याचे काम सुरू असून ते काम पूर्ण होण्यास अजूनही १४ महिन्यांचा अवधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात उतार व्यवस्था अर्थात स्लोपिंग रॅम्प चे काम पूर्ण झाले असून या तात्पुरत्या रॅम्पला दगडी मजबुतीकरण व जेट्टी कडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
मारंबळ पाडा (विरार) ते खारवाडेश्री दरम्यान रोरोसेवा चालवण्यासाठी मे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता या सेवेची पहिली फेरी प्रायोगिक तत्त्वावर नारंगी येथून सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर कार्यरत राहणाऱ्या फेरीबोटीचे जल मार्गातून होणारे नौकानयन तसेच वाहनांची चढ – उतार करण्याबाबत सुलभता व सुरक्षितता अभ्यास करून नंतर औपचारिक लोकार्पण करण्यात येईल असे महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.
अंतर व वेळेची बचत
खारवाडेश्री ते नारंगी असे रस्ते मार्गे अंतर ६० किलोमीटर असून त्याला दीड तासांचा कालावधी लागतो. हा प्रवास जल मार्गाने केल्यास दीड किलोमीटर चे अंतर असून त्याकरिता साधारण १५ मिनिटांच्या कालावधी लागणे अपेक्षित आहे. या रो-रो सेवेमुळे विरार, वसई तसेच सफाळे, केळवे परिसरातील स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना दोन तालुक्यांमधून ये-जा करणे सुलभ होणार आहे. विरार येथून जिल्हा मुख्यालयाला पोहोचण्यासाठी रस्ते मार्गे लागणारे ७० किलोमीटरचे अंतर निम्म्यावर येणार असून त्यामुळे इंधन व वेळेची बचत होणार आहे.
दिवसाला २१ फेऱ्या
मारंबळपाडा ते खारवाडेश्री हे अंतर रो-रो फेरीबोटीला कापण्यासाठी सुमारे १५ मिनिटांचा अवधी असून प्रत्येक फेरी पोहोचल्यानंतर वाहनांना उतरण्यासाठी तसेच नवीन वाहना चढण्यासाठी १५- २० मिनिटांचा अवधी ठेवण्यात आला आहे. २० एप्रिल पासून प्रायोगिक तत्त्वावर सकाळी ६.३० वाजता विरार येथून पहिली फेरी निघणार असून अखेरची फेरी सायंकाळी ७ वाजता खारवाडेश्री येथून निघणार आहे. २५ एप्रिल पासून रात्रीच्या फेऱ्या सुरू होणे अपेक्षित असून अखेरची फेरी रात्री १०.१० वाजता खारवाडेश्री येथून विरारसाठी निघणार आहे.
रो-रो सेवेचे प्रस्तावित दर
रो-रो सेवा पुरवणाऱ्या या कंपनी तर्फे दाभोळ, जयगड, बाणकोट, दिघी तसेच वसई- भाईंदर दरम्यान १० फेरीबोट कार्यरत असून विरार ते खारवाडेश्री दरम्यान रो-रो सेवेचे दर वसई – भाईंदर दरम्यानच्या दराच्या बरोबरीने आहेत. विरार ते खारवाडेश्री दरम्यान मोटरसायकल साठी ६६ रुपये, रिकामी तीन चाकी रिक्षासाठी ११० रुपये, लहान चार चाकी वाहनांसाठी २०० रुपये, मोठ्या चार चाकी वाहनांसाठी व रिकामी मध्यम मालवाहू जड वाहनांसाठी २२० रुपये अशी दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. याच बरोबरीने प्रौढ प्रवाशांना ३० रुपये, लहान प्रवाशांना १५ रुपये, मासे, फळे (टोपली) शेळी, मेंढी, कुत्रा यांना प्रति नग ४० रुपये तर कोणताही माल वाहतुकीस प्रति अर्धा टन ३० रुपये अशी आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. एका फेरीबोटीत २० लहान चार चाकी वाहन व २५ दुचाकी व प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचे शिपिंग कंपनीतर्फे माहिती देण्यात आली.